विरार – मुंबई जवळील विरारमध्ये दुर्दैवी घटना घडली आहे. इमारतीचे बांधकाम सुरू असताना भिंत कोसळून 3 महिला कामगारांचा मृत्यू, तर एक जण गंभीर जखमी असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना आज दुपारी 3.30 वाजताची आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विरार पूर्वच्या मनवेलपाडा रोडवर ही दुर्घटना घडली आहे. या परिसरात सूर्य किरण या बिल्डिंगचे रिडेव्हलपमेंटचे काम सुरू आहे. आज दुपारी बांधकाम सुरू असताना भिंत कोसळून चार कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची घटना घडली आहे. या घटनेत तीन महिला कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी आहे.
आज दुपारी 3.30 च्या सुमारास हे कामगार काम संपल्याने घराकडे निघत होते. मात्र काम संपल्यानंतर साचलेल्या पाण्यातच हात पाय धुताना बांधलेली भिंत या कामगारांच्या अंगावर कोसळली. त्या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली चार कामगार अडकले होते. हा प्रकार लक्षात आल्यानंतर बचावकार्य सुरु करण्यात आले.
अग्निशमन पथकाच्या जवानांमार्फत जखमी कामगारांना रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचाराआधीच तीन महिला कामगारांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत जखमी असलेल्या एका मजुरावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शाहूबाई अशोक सुळे (वय 45), लक्ष्मीबाई बालाजी गावाने (वय 45), राधाबाई एकनाथ नावघरे ( वय 40) असे मयत झालेल्या महिला कामगारांची नाव आहेत. तर यात एक महिला नंदाबाई अशोक गव्हाणे (वय 32) आणि एक पुरुष मजूर जखमी झाले आहेत.