मुंबई – आगामी पालिका निवडणुकीसाठी प्रभागाऐवजी एक सदस्यीय वार्ड पद्धत जाहीर केली होती. पण आता मुंबई वगळता इतर महापालिका निवडणुकीसाठी तीनचा प्रभाग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मिनी विधानसभा म्हणून ओळखलेल्या जाणाऱ्या 2017 च्या मनपा निवडणुकीत पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर, नागपुरात भाजपची एकहाती सत्ता आली होती.
या सदस्यसंख्येवरून महाविकास आघाडीत मतभेद असल्याची चर्चा रंगली होती. शिवसेनेने 4 सदस्यांची भूमिका घेतली असून राष्ट्रवादी कॉंग्रेसने मात्र 2 सदस्यांची भूमिका घेतल्याचे सांगितले जात होते. मात्र, अखेर 3 सदस्यीय प्रभाग पद्धती स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन निर्णय जाहीर केला आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले, राज्यात मुंबई वगळता इतर सर्व महानगर पालिकांमध्ये 3 सदस्यीय प्रभाग रचना स्वीकारण्यात आली आहे. मुंबईत मात्र एकसदस्यीय प्रभाग रचना कायम ठेवण्यात आली आहे. त्यासोबत नगरपालिका आणि नगरपरिषदांमध्ये 2 सदस्यीय प्रभाग रचना, तर नगरपंचायतींमध्ये एक सदस्यीय प्रभाग रचना असेल, असे त्यांनी सांगितले.
हा निर्णय जनतेच्या फायद्यासाठी घेण्यात आला आहे. सदस्यसंख्या जास्त असेल, तर जनतेसाठी विकासकामे करणे अधिक सुलभ होते आणि कामे देखील वेगाने होतात. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. या निर्णयासह नागरी स्थानिक संस्थांमधील नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या आरक्षणासंदर्भात प्रमाण निश्चिती करण्यासाठी अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, पनवेल, मिरा-भाईंदर, सोलापूर, नाशिक, मालेगाव, परभणी, नांदेड-वाघाळा, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर आणि चंद्रपूर या महापालिकांच्या निवडणुका पुढील वर्षी होणार आहेत.