पिरंगुट – मुळशी धरण परिसरात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुळशी धरण 83 टक्के भरले आहे. गेल्या चार दिवसांत मुळशी धरणाच्या पाणीसाठ्यात तब्बल 35 टक्क्यांनी वाढ झालेली आहे. बुधवारी (दि. 24) धरणात 46 टक्के पाणीसाठा होता.
जिल्ह्यात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे बळीराजा सुखावला असून उजनी सोडून जवळपास सर्वच धरणे भरत आली आहे. तर इंदापूर तालुक्यावर वरुणराजा अद्यापही रुसलेलेला आहेत. तर आंबेगाव, जुन्नर, वेल्हे, भोर, खेड, हवेली, मावळमध्ये वरुणराजाने ज्याप्रकारे मुक्तहस्ताने उधळण केली आहे, त्यापद्धतीने बारामती, शिरूर, दौंड, पुरंदर तालुक्यांवर कृपादृष्टी केलेली नाही.
मुळशी तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. विशेषतः धरण भागातील मुळशी कॅम्प, दावडी, ताम्हिणी, शिरगांव, आंबवणे भागात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे मुळशी धरणात विविध भागातून ओढ्या नाल्याद्वारे पाण्याचे लोंढेच्या लोंढे येत आहेत. डोंगर माथ्यावरून पाण्याचे लोट वाहत धरणाच्या पाणीसाठ्यात जमा होत आहे. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. अखेर धरणाचा पाणीसाठा 83.77 टक्के झाला आहे. सध्या पावसाची हजेरी पाहता लवकरच मुळशी धरण हे भरण्याच्या मार्गावर आहे. त्यातच 80 टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा झाल्याने सुरक्षेच्या कारणास्तव मुळशी धरणातून केव्हाही मुळा नदीत पाणी सोडण्यात येऊ शकते.