मांजरी- मांजरी बुद्रुक परिसरातील मांजराईनगर, सटवाईनगर, राजीव गांधीनगर, माळवाडी, कुंजीरवस्तीसह झोपडपट्टी भागांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई आहे. पुरेसा पाणीपुरवठा व्हावा या मागणीसाठी तीन आठवड्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनाकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे येथील नागरिक आता मुळा-मुठा नदीत जलसमाधी घेणार आहेत.
याविरोधात मांजरी कृती समितीसह स्थानिक नागरिक सुमारे तीन आठवड्यांपासून धरणे आंदोलन करीत आहेत. मात्र, आंदोलनाला प्रशासन कोणतीही दाद देत नसल्याने कृती समितीकडून जलसमाधी घेण्याचा इशारा महापालिका प्रशासनाला देण्यात आला आहे.
मांजरी बुद्रुकमधील पाण्याची तीव्र टंचाई असलेल्या भागातून सुमारे 15 ते 20 हजार लोकसंख्या राहते. येथील बहुतांश नागरिक मोलमजुरी व शेतमजुरी करून उपजीविका करतात. येथील काही भागांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा होतो. मात्र, हा पाणीपुरवठा म्हणजे निव्वळ मलपट्टी असून परिसरातील सटवाई नगर, माळवाडी गावठाण, कुंजीर वस्ती, वेताळ वस्ती, राजीव गांधीनगर भागातील नागरिकांना पाण्यासाठी अक्षरश: वणवण करावी लागत आहे.
मांजराई देवीसमोरील सार्वजनिक विहिरीमध्ये एक लाख लिटर पाणी पुणे मनपाने सोडावे व त्यामधून वरील सर्व झोपडपट्टी भागामध्ये भागामध्ये पुरवावे, या मागणीसाठी बेमुदत धरणे आंदोलन तीन आठवड्यांपासून सुरू आहे. त्याकडे प्रशासन लक्ष देत नसल्याने आंदोलक मुळा-मुठा नदीपात्रात जलसमाधी घेऊन आंदोलन अधिक तीव्र करणार आहोत.
– राजेंद्र साळवे, अध्यक्ष, अखिल मांजराई नगर कृती समिती