नवी दिल्ली – रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी कंपनीचे नेतृत्व पुढच्या पिढीकडे लवकर सोपविण्याच मनस्थितीत असल्याचे दिसून येते. रिलायन्स फॅमिली डे निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुकेश अंबानी यांनी पहिल्यांदाच असे भाष्य केले आहे.
मुकेश अंबानी यांना आकाश, ईशा आणि अनंत अशी तीन मुले आहेत. ते म्हणाले की, रिलायन्स इंडस्ट्रीज हरित ऊर्जा, रिटेल आणि दूरसंचार क्षेत्रात उत्तम काम करीत असून ही कंपनी जागतिक पातळीवरील नामांकित कंपनी होईल. योग्य व्यक्ती घेऊन त्याच्याकडे जबाबदारी सोपविणे हे यशाचे गमक असल्याचे सांगून ते म्हणाले की, माझ्यासह आता कंपनीतील वरिष्ठ नेतृत्वाची जागा तरुण पिढीकडे हळूहळू हस्तांतरित करण्याची वेळ आली आहे.
आपली पुढची पिढी अत्यंत हुशार, कार्यक्षम असून यावेळी त्यांच्याकडे नेतृत्व दिल्यानंतर आपल्याला त्यांना मार्गदर्शन करता येईल आणि त्यांच्या यशावर समाधान व्यक्त करता येईल. मात्र त्यांनी नेमके काय करणार याचा तपशील दिला नाही. आपली मुले आणि इतर वरिष्ठ अधिकारी रिलायन्स कंपनीला आगामी काळामध्ये आणखी उच्च शिखरावर नेऊन पोहोचवतील याची मला खात्री आहे.
भारतातील असंख्य लोकांचे जीवनमान वाढावे आणि भारताचा विकास दर वाढावा अशी धीरूभाई अंबानी यांची तीव्र इच्छा होती. आपल्या मुलांमध्ये हे आपल्याला ते गुण दिसून येतात. भविष्याबाबत बोलताना ते म्हणाले की, भारत करोनाच्या अडचणीतून बाहेर पडून जगातील सर्वात मोठी तिसरी अर्थव्यवस्था होईल.
त्याचबरोबर रिलायन्स जगातील एक नामांकित कंपनी होईल. करोनाच्या काळात रिलायन्स कंपनीने उत्तम कार्य केले असल्याबद्दल त्यांनी अभिमान व्यक्त केला. करोनाच्या काळात आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी काय करावे लागेल याची आपल्याला माहिती मिळाली आहे. त्यामुळे रिलायन्स परिवारातील सर्वांनी योग्य आहार, योग्य वर्तणूक, योग्य विचार, ध्यान, खेळ, व्यायाम याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.