सार्वजनिक बांधकाम विभागाची मलमपट्टी व गटारांचे कामही अर्धवट
शिक्रापूर- कोरेगाव भीमा (ता. शिरूर) परिसरात गेल्या महिन्यापासून जोरदार पावसामुळे पुणे नगर महामार्गाची अक्षरश: चाळण झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग खड्यांमध्ये तात्पुरती मलमपट्टी करत असल्याने थोडा पाऊस झाला की पुन्हा खड्डयांमध्ये दुचाकीस्वार पडण्याचे प्रकार घडत आहे. रस्ता दुरुस्तीला मुहुर्त मिळत नसल्याने अनेक अपघात होत आहेत. अर्धवट गटारांच्या कामांमुळेही परिसरात दुर्गंधी पसरून वेगवेगळ्या आजारांचे प्रमाणही वाढले आहे.
कोरेगाव भीमा येथील नगर महामार्गावर मागील आठवड्यापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नगर रस्त्यावरील वढु चौक ते डिंग्रजवाडी फाट्यापर्यंतचा रस्ता पाण्याखाली जावून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असल्यामुळे अनेक दुचाकीस्वार खड्डयात पडून अपघात झाले होते. याबाबत मागील आठवड्यात वृत्त प्रसारित झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने दि. 25 सप्टेंबर रोजी रात्रभर कोरेगाव भीमातील रस्त्यावरील पाणी मशिनच्या सहाय्याने काढून रस्त्यावर खड्डड्यांमध्ये कॉंक्रिट भरून रस्ता पूर्ववत केले. रस्त्यावरील पाणी वाहून जाण्यासाठी असलेले गटार जाम झाल्याने त्याठिकाणी नवीन बंदीस्त गटर टाकण्याचे काम हाती घेतले. काही प्रमाणात सार्वजनिक बांधकाम विभागाने गटारांची कामे सुरू केली. मात्र, ती कामे अर्धवट अवस्थेत असल्याने मोठी दुर्गंधी तर पसरत आहेच.
याशिवाय परिसरातील बंदिस्त गटारांचे पाईप फोडल्याने त्यातील पाणीही रस्त्यावर येत असल्याने मोठी दुर्गंधी तर पसरत आहे. नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. रस्त्यावरील खड्डे पूर्ववत करण्यासाठी बांधकाम विभागास मुहुर्त मिळत नसल्याने दुचाकी व चारचाकी वाहनचालकांना वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता नवनाथ शेळके यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, रस्ता दुरुस्तीचे काम आज पूर्ण होईल, असे सांगितले आहे. नाहक 50 लाखाचा भुर्दंड बांधकाम विभागावर पडल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, पन्नास लाख खर्च होऊनही कोरेगाव भीमाचा रस्त्यावरील खड्डे व पाण्याचा प्रश्न निकाली निघाला नाही.
- नऊशे मीटर गटारचे काम होईल का?
कोरेगाव भीमा येथील अनेक वषार्ची रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने पंधरा दिवसांपूर्वी काम हाती घेतले आहे. अद्याप हे काम पूर्णत्वास गेले नसुन कामही बंद पडले असल्याने सुमारे नऊशे मीटर लांबीचे बंदिस्त गटारीचे काम होईल की नाही, याबाबत शंका उपस्थित होऊ लागली आहे.