सुमारे हजार कोटी रुपयांचा फटका
पुणे – महावितरणचे उत्पन्न अडीच महिन्यांत निम्म्याने कमी झाले आहे. सुमारे हजार कोटी रुपयांचा फटका बसला आहे.
दि. 23 मार्चपासून उद्योगधंदे बंद आहेत. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड, भोसरी, हिंजवडी, चाकण, हडपसर, खराडी येथील उद्योग आणि आयटीची कार्यालये बंद केली. त्यांना “वर्क फ्रॉम होम’चे आदेश देण्यात आले होते. प्रत्यक्षात त्या आधीपासून आयटी कंपन्यांनी लांब राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना घरूनच काम करण्याविषयीच्या सूचना दिल्या होत्या. त्यामुळे कंपन्यांनी आधीच कार्यालये बंद ठेवण्याला सुरुवात केली होती.
आयटी आणि अन्य उद्योग बंद असल्यामुळे तसेच दुकाने, मॉल्स, बाजारपेठाही बंद होते. सरकारी आणि खासगी आस्थापनांही काही अंशी बंद असल्याने तेथेही विजेचा वापर कमी प्रमाणात
झाला.
या कालावधीत केवळ घरगुती विजेचा, दवाखाने आणि स्ट्रीट लाइटस यांचाच वापर केला गेला. त्यामुळेही उत्पन्नात घट झाली आहे, असे पुणे विभागाचे मुख्य अभियंता सचिन तालेवार यांनी सांगितले.
ऍव्हरेज पद्धतीने बिले
लॉकडाऊनमुळे महावितरणची बिले लोकांपर्यंत पोहोचली नाहीत. त्यामुळे लोकांनीही वीजबिल भरले नाही. तसेच, रोजगारच बंद असल्यामुळे समाजातील काही वर्गांकडे हातात पैसेच नाहीत. त्यामुळे त्यांचे बिल थकले आहे. याशिवाय, काही जणांना लॉकडाऊनमुळे कुठे जाऊन बिल भरायचे याची माहिती नसल्याने ती बिलेही भरली गेली नाहीत. काही लोकांनी मात्र ऑनलाइन पद्धतीने वीज भरणा केला आहे. ऍव्हरेज पद्धतीने या दोन महिन्यांचे बिल काढण्यात आले आहे.