नगर -आपत्कालीन भारनियमन करण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर अतिभारीत वीज वाहिन्यांवरील रोहित्रांकडे विशेष लक्ष देऊन त्या रोहित्राची क्षमता व त्याच्यावरील वीजभार तपासण्याची मोहिम राज्यभर राबविण्यात येत आहे. यानुसार आकडे टाकून वीज चोरी करणाऱ्यांविरुद्ध नगर मंडलात धडक मोहिम हाती घेतली असून, 21 व 22 एप्रिल या दोन दिवसात 2 हजार 405 आकडे काढून त्यांच्या केबल जप्त करण्याचे काम केले आहे. तसेच 239 वीज चोराविरुद्ध कारवाई केली आहे. या प्रयत्नांमुळे दोन दिवसात या वीज वाहिन्यांवरील ताण कमी होऊन वीजभार हलका होण्यास मदत झाली आहे.
या मोहिमेमध्ये कारवाई करताना ज्या 11 केव्ही वाहिन्यांचा करंट 100 एम्पिअरच्या पुढे असलेल्या विद्युत वाहिन्या नगर मंडळात आहेत. त्यांना लक्ष्य करुन गुरुवारी व शुक्रवारी सकाळपासूनच धडक मोहिम हाती घेतली होती. यामध्ये अनधिकृतपणे कृषीपंपाला जोडलेले केबल आदी जप्त केले आहेत. घरगुती व इतर ग्राहकांचे आकडे सुद्धा यावेळी काढण्यात आले.
नाशिक परिमंडलाचे मुख्य अभियंता दिपक कुमठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नगर मंडळाचे अधिक्षक अभियंता सुनील काकडे यांच्या नेतृत्वाखाली सर्व कार्यकारी अभियंते यांच्यासह विविध पथकामध्ये अभियंते, अधिकारी, कर्मचारी व जनमित्र यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. ही कारवाई अशीच सुरु राहणार आहे.यामध्ये नगर मंडळातील अनधिकृतपणे वीज तारांवर आकडे अथवा हुक टाकणाऱ्या विरुद्ध कार्यवाही करण्यात आली आहे.
यात संगमनेर विभागात हुक टाकणाऱ्या 898 कृषी तर 129 इतर वर्गवारीचे ग्राहक असून वीजचोरी करणारे 5 कृषी व 51 इतर ग्राहकांचा समावेश आहे. श्रीरामपूर विभागात हुक टाकणाऱ्या 353 कृषी तर 37 इतर ग्राहक असून वीजचोरी करणारे 4 इतर ग्राहकांचा समावेश आहे. नगर शहर विभागात हुक टाकणाऱ्या 314 कृषी तर 122 इतर ग्राहक असून वीजचोरी करणारे 40 कृषी व 52 इतर ग्राहकांचा समावेश आहे. नगर ग्रामीण विभागात हुक टाकणाऱ्या 171 कृषी तर 105 इतर ग्राहक असून वीजचोरी करणारे 82 इतर ग्राहकांचा समावेश आहे. कर्जत विभागात हुक टाकणाऱ्या 222 कृषी तर 54 इतर ग्राहक असून वीजचोरी करणारे 5 इतर ग्राहकांचा समावेश आहे. असे एकूण नगर मंडळात हुक टाकणाऱ्या कृषी ग्राहकांमध्ये 1 हजार 958 तर 447 इतर ग्राहक असून वीजचोरी करणारे 52 कृषी व 187 इतर असून अशाप्रकारे यामोहिमेत एकूण 2 हजार 644 अनधिकृत जोडण्या काढण्यात आलेल्या आहेत.
मुख्यालय पातळीवरून सर्व वीजवाहिन्याचा आढावा घेण्यात येत आहे. त्या अनुषंगाने अतिभारीत असलेल्या वीज वाहिन्यांची माहिती क्षेत्रीय स्तरावरील संबंधित अधीक्षकाऱ्यांकडे पाठवली आहे. रोहित्रांवरील अतिरिक्त भार कमी न झाल्यास सबंधितांना जबाबदार धरण्यात येऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल., असा इशारा देण्यात आला आहे.