ओतूर – ओतूर (ता. जुन्नर) येथे शेतकऱ्यांची वीज तोडल्यानंतर महावितरण विरोधी वातावरण निर्माण झाले आहे. अडचणीत सापडलेल्या बळीराजाला आगीतून फुफाट्यात, अशी वेळ आल्यावर शेतकरी व शेतकरी संघटनांनी महावितरण विरोधी
आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला. शेतकरी संघर्ष संघटनेच्या आंदोलनानंतर महवितरण कंपनीकडून ओतूर आणि परिसरातील शेतकऱ्यांचा खंडित वीजपुरवठा पुन्हा सुरळीत करण्यात आला.
ओतूर, उदापूर, नेतवड, माळवाडी, डिंगोरे, पाथरटवाडी परिसरातील सुमारे 200 शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. दरम्यान, कोणत्याही शेतकऱ्यांचा थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित करू नये, म्हणून शेतकरी संघटनेकडून वेळोवेळी निवेदन देण्यात आले होते.
तसेच त्याबाबत औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयाचा दाखला ही देण्यात आला होता. तरी देखील ओतूर आणि परिसरातील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित केला. यामुळे संतप्त होऊन शेतकरी संघर्ष संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनी सोमवारी (दि. 25) रात्री ओतूर पोलीस ठाण्यात धाव घेत महावितरणवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
तसेच मंगळवारी (दि. 26) महावितरणच्या कार्यालया समोर ठिय्या आंदोलन केल्यानंतर ज्या शेतकऱ्यांची वीज खंडित करण्यात आली होती त्यांची वीज जोडून देण्याचे मान्य करून वीजपुरवठा सुरळीत केल्यावर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.
यावेळी आंदोलक शेतकरी संघर्ष संघटनेचे तानाजी तांबे, लक्ष्मण शिंदे, किरण डोके, धनंजय ढमाले, रवीराज चाळक, विजय तांबे, किरण डोके, श्रीराम डोके, हर्षल भाटे, सिताराम ढमाले,
राजेश वाकर, सीताराम डुंबरे, ज्ञानेश्वर तांबे, गोपाळ तांबे, अमोल तांबे, बबन तांबे, प्रमोद ढमाले, बाळासाहेब ढमाले इतर उपस्थित होते. तर याविषयी महावितरणचे अमित भरते यांच्या सोबत संपर्क केला असता संपर्क होवू शकला नाही.