दोन वर्षांत केवळ 26 जणांवर फौजदारी कारवाई
तडजोडी ऐवजी कठोर शिक्षेची गरज
महावितरणची वीज चोरी हा कायद्याने फौजदारी स्वरुपाचा गुन्हा आहे. मात्र याच कायद्यात बिलाची आणि दंडाची रक्कम भरण्याची तरतूद असल्यामुळे वीज चोरांना पळवाट मिळत आहे. तडजोडीऐवजी या कायद्यात कठोर कारवाईच्या शिक्षेची तरतूद केल्यास वीज चोरीचे प्रमाण कमी होण्यास मदत होऊू शकते.
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात औद्योगिक वसाहतीमधील व्यवसायिकांसह सर्वसामान्य नागरिकांकडून वीजचोरीचे अनेक प्रकार वाढत असताना गेल्या दोन वर्षांत केवळ 26 जणांवर फौजदारी कारवाई करण्यात आली आहे. वीजचोरीकडे महावितरणचे दुर्लक्ष होत असल्याने वीजचोरांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून यावर आळा घातल्यास सर्वसामान्य नागरिकांना योग्य दरात वीज उपलब्ध होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या 20 ते 22 लाखांच्या घरात पोहोचली आहे. शिवाय दहा हजारांहून अधिक लघु उद्योजक आणि राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपन्या औद्योगिक वसाहतीमध्ये आहेत. त्यामुळे शहरात विजेची मागणीही मोठ्या प्रमाणात असते. त्यातच सध्या उन्हाळ्याच्या दिवस असल्याने घरगुती विजेच्या मागणीतही वाढ झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून वीज गळती आणि वीजचोरी रोखण्यात महावितरणला अपयश येत असल्यामुळे दिवसेंदिवस वीजेच्या दरात वाढ केली जात आहे. गेल्या दोन वर्षांच्या कालावधी महावितरणने कडक कारवाईकडे दुर्लक्ष करत केवळ तडजोडी करण्यावर व दंड वसूल करण्यावर भर दिल्याने निर्ढावलेल्या वीज चोरांकडून मोठ्या प्रमाणात वीज चोरी सुरू आहे.
मीटरमध्ये फेरफार करणे, डायरेक्ट कनेक्शन जोडणे, वीज वाहिन्यांवर आकडे टाकून थेट वीज जोड घेणे, सर्किटमध्ये फेरफार करणे या व इतर माध्यमातून वीजेची चोरी करण्याचे प्रकार वारंवार उजेडात आले आहेत. वीज चोरी रोखण्यासाठी महावितरणकडून भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. मात्र या भरारी पथकाकडून अपेक्षित कारवाई केली जात नसल्याने तसेच पकडले गेल्यास दंड भरून बाहेर पडण्याची पळवाट असल्याने चोरीमध्ये दिवसेंदिवस वाढच होत आहे. वीजेची चोरी आणि गळतीमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानाचा भार महावितरण दरवर्षी सर्वसामान्य ग्राहकांवर दरवाढीच्या रुपात टाकत आहे. चोरांची कृत्यांची किंमत प्रामाणिक सर्वसामान्य नागरिकांना भरावी लागत असल्याने नागरिकांमध्ये असंतोष आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या दरामुळे सर्वसामान्य नागरिक दबला जात आहे. या प्रकारांना आळा घातल्यास तोटा कमी होण्यास मदत होऊ शकते शिवाय दरवाढ करण्याची आवश्यकताही भासणार नसल्याचे ग्राहकांमधून बोलले जात आहे.