बारामती(प्रतिनिधी) – बारामती परिमंडलाने गेल्या पाच दिवसांमध्ये आकडे बहाद्दरांविरुद्ध धडक कारवाई करुन वीज यंत्रणेवरील वाढीव ताण कमी करण्याचे मोठे काम केले आहे. परिमंडलातील 489 ओव्हरलोड फिडरवरील कारवाई करताना तब्बल 6201 आकडे पकडून जप्त करण्यात आले. त्यामुळे साधारणत 174 मेगावॅटचा वाढीव ताण कमी झाला आहे.
वाढत्या तापमानामुळे राज्याची मागणी विक्रमी पातळीवर पोहोचत असताना कोळसा टंचाईमुळे मागणी व पुरवठ्यामध्ये तफावत निर्माण झाली आहे. महाराष्ट्र शासनाने व महावितरणने मिळून ह्या संकटावर मात केली आहे. तूट भरुन काढताना महागडी वीज कमीत कमी घेण्याची वेळ यावी यासाठी कंपनीने वीज चोरांविरोधात राज्यभर धडक कारवाई केली. यामध्ये बारामती परिमंडलाने तब्बल 6201 आकडे काढून जप्त केले आहेत.
ज्या फिडरचा लोड 100 ॲम्पीअरपेक्षा जास्त आहे. अशा 489 फिडरवरील अनाधिकृत आकडे, मंजूर क्षमतेपेक्षा जास्त असलेला वापर काढून टाकण्यात आला. कारवाईपूर्वी 20 तारखेला या फिडरवरील भार 1728 मेगावॅट होता. कारवाई अंती 25 तारखेला तो 1554 मेगावॅटवर आला. यंत्रणेवर येणारा सुमारे 174 मेगावॅटचा ताण या धडक मोहिमेमुळे वाचला असून, 489 पैकी 126 फिडरचा भार 10 टक्क्यांनी कमी झाला आहे, हे विशेष.
धडक कारवाई करताना वीज कर्मचाऱ्यांनी अवैधरित्या टाकलेले केबल, स्टार्टर जप्त् केल्याने हजारो शेतकऱ्यांनी त्यांचे आकडे स्वत:हून काढून टाकले. अतिरिक्त भार झपाट्याने कमी होण्यास मदत झाली. यापुढेही महावितरणची कारवाई चालूच असल्याने आकडे बहाद्दरांचे धाबे दणाणले आहेत.