नवी दिल्ली – विराट कोहली व महेंद्रसिंह धोनी यांच्यातील सर्वात चांगला कर्णधार कोण या प्रश्नावर रवींद्र जडेजाने अत्यंत सावध प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
दोन्ही कर्णधार म्हणून उत्तम आहेत. त्याच्यात सरस कोण हा फरक करणे अत्यंत कठीण आहे. एक खेळाडू, कर्णधार आणि मित्र म्हणून धोनीची उणीव सातत्याने जाणवते हे मात्र, खरे, अशा शब्दांत जडेजाने धोनीबद्दलच्या भावना व्यक्त केल्या.
ज्यावेळी भारतीय संघात स्थान मिळाले तेव्हापासून धोनीने सातत्याने मार्गदर्शन केले तसेच माझ्या चुका कशा दुरूस्त करता येतील तेदेखील वारंवार दाखवून दिले. त्यामुळेच माझ्या खेळात सुधारणा झाली, असेही जडेजा म्हणाला.
दोघेही कर्णधार म्हणून वेगळे आहेत. धोनी शांत आहे तर, विराटच आक्रमक. मात्र हे दोघेही संघातील सगळ्या खेळाडूंना पूर्ण पाठिंबा देतात हेच महत्त्वाचे आहे, असेही तो म्हणाला.