नवी दिल्ली : देशात मागच्या दोन दिवसापासून नकोशी अशी कोरोनाबाधितांची विक्रमी आकडेवारी समोर आली आहे. त्यातच आरोग्य सुविधांचा तुडवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. कुठे रेमेडीसिवीर इंजेक्शन तर कुठे ऑक्सिजनचा तुडवडा भासत आहे. दिल्लीत देखील हीच परिस्थिती असल्याने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कळकळीची विनंती केली आहे. “पंतप्रधान महोदय, कृपया कॉल करा म्हणजे ऑक्सिजन दिल्लीला पोहोचेल” असे म्हटले आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्यांनी दिल्लीतील ऑक्सिजनच्या तुटवड्यावर चिंता व्यक्त केली.यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, ‘पंतप्रधान महोदय, कृपया कॉल करा म्हणजे ऑक्सिजन दिल्लीला पोहोचेल.’दिल्लीत ऑक्सिजन कारखाना नसेल तर दिल्लीतील 2 कोटी लोकांना ऑक्सिजन मिळणार नाही का? असा संतप्त सवाल देखील यावेळी केजरीवाल यांनी विचारला. दिल्लीत कारखाना नसेल तर ज्या राज्यात ते आहेत ते देणार नाहीत का? जर काही राज्यांनी दिल्लीच्या कोट्यात ऑक्सिजन थांबविला असेल तर मी फोन लावून कोणाशी बोलू नये? असेही त्यांनी म्हटले आहे. तसेच पंतप्रधान मोदींनी योग्य वेळी कोरोना बैठक बोलावली. आम्ही दिल्लीच्या जनतेच्या वतीने हात जोडून आवाहन करीत आहोत की, कठोर पावले उचलली नाहीत तर मोठा प्रकोप होऊ शकतो.
ते म्हणाले की, जिथे सर्वात मोठी समस्या भेडसावत आहे तेथे दिल्लीकडे येणारे ऑक्सिजन ट्रक्स थांबवले जात आहेत. पंतप्रधानजी, कृपया त्या राज्यातील मुख्यमंत्र्यांना बोला जेणेकरुन ऑक्सिजन दिल्लीपर्यंत पोहोचू शकेल. लोक खूप संकटात आहेत. घडणाऱ्या घटना पाहिल्या जात नाहीत. केजरीवाल म्हणाले, ‘दिल्लीचे मुख्यमंत्री असूनही मी माझ्या राज्यासाठी काहीही करू शकत नाही. पंतप्रधानांनी देशातील सर्व ऑक्सिजन प्लांट्स ताब्यात घ्याव्यात. आणि जेव्हा ऑक्सिजन ट्रक सैन्याच्या देखरेखीखाली त्या त्या ठिकाणी पोहचावा जेणेकरून कोणतेही राज्य हे थांबवू शकत नाही. ‘
मुख्यमंत्री केजरीवाल पुढे म्हणाले की, लसीचे दर जाहीर करण्यात आले आहेत. 1 मेपासून 18 वर्षांपेक्षा जास्त वयाची लसीकरण करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने म्हटले आहे की, राज्ये देखील लस खरेदी करु शकतात. केंद्राला दीडशे रुपये आणि राज्यात 400 रुपये लस मिळणार आहे. लस दर समान असावा. देशाच्या दोन किंमती कशा असू शकतात. देशासाठी ‘एक लस एक दर’ असावा. अशी देखील मागणी त्यांनी केली आहे.