राष्ट्र निर्मितीत समाज घटकांना केंद्रबिंदू मानून व्यापक जनहित जोपासणारे दूरदृष्टीचे नेते, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी 50 वर्षांत अवितरतपणे काम केले आहे. समाजमनाचा ठाव घेऊन त्यांची अंमलबजावणी हा त्यांचा हातखंडा आहे. गावपातळीपासून जगभरातील घडामोडींचा अभ्यास करून लवचिकता ठेवली. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून उपेक्षित आणि वंचित समाजघटकांना मुख्य प्रवाहात आणले आहे. त्यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा घेतलेला आढावा…
इंदापूर शहरासह तालुक्यात मी पतित पावन संघटनेचे काम करीत होतो. त्यावेळी प्रत्येक घटकांमध्ये समरूप होतो. माझ्या वडिलांचा आणि पवार साहेबांचा स्नेह होता. मात्र, माझी ओळख नव्हती. 1983 मध्ये मुंबई येथे क्रिकेटचे सामने पाहण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी साहेब मुख्यमंत्री होते. स्टेडियममध्ये मी त्यांना भेटलो. माझी ओळख करून दिली. त्यांनी माझ्याशी संवाद साधताना कामाचाच आवाका जाणून घेतला.
विरोधी गटात काम करीत असताना मी शहरातील विविध कामाची सोडवणूक करीत होतो. तरूण कार्यकर्त्याला बळ दिले पाहिजे, ही भावना साहेबांमध्ये होती. त्यासाठी ते विरोधक आहेत, म्हणून सापत्नभावाची वागणूक दिली नाही. काम करणाऱ्याला ते निधी देत होते. याची प्रचिती मी इंदापूर नगरपालिकेत असताना आली.
साहेब हे संरक्षणमंत्री असताना जनहित आणि सर्वसामान्यांची कामे कशी करावीत, याचा प्रत्यय आला. एअरफोर्समधील मुलाखतीसाठी एका मुलीला दिल्लीला जायचे होते. त्यावेळी मी त्यांच्या घरी गेलो होतो. मात्र, त्यावेळी पवार कुटुंबीयात दु:खद घटना घडली होती. सांत्वनासाठी राज्यभरातून हजारो लोक आले होते. त्या परिस्थितीत त्या मुलीशी साहेबांनी पंधरा मिनिटे संवाद साधला. त्याचवेळी माझ्या मनात साहेब घर करून राहिले.
लोकसभेत प्रथम गेल्यानंतर तेथील वातावरणाशी जुळवून घेतले. दिल्लीत क्लास लावून त्यांनी इंग्रजी भाषा शिकून घेतली. साहेबांनी कार्यकर्ते, सर्वसामान्यांचे चेहरे वाचून त्यांचे प्रश्न सोडविले आहे. कार्यकर्त्याला ताकद दिली तर पक्ष मोठा होतो, हे तत्त्व त्यांनी अंगीकारले. कर्तबगार लोकांना ताकद दिली. त्यांच्या नजरेतील कटाक्ष सर्वकाही सांगून जाते.
आज 80 व्या वर्षी ते अवितरपणे समाजकार्य आणि राजकारण करीत आहेत. साहेब हे आपत्ती व्यवस्थापनाचे रोल मॉडेल आहेत. कामाची पूर्तता आणि नेतृत्वगुण ही त्यांची शक्तीस्थळे आहेत. मागील पाच वर्षांत भाजपाची सत्ता असताना अनेक पदे भूषविलेले राष्ट्रवादीचे नेते पक्ष सोडून जात होते. त्याही प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी कार्यकर्ते, नेत्यांना धीर देत आपल्या शिलेदारांना बळ दिले. ईडीच्या चौकशीला ते डगमगले नाहीत. भरपावसातील त्यांचा प्रचार सर्वसामान्यांसह तरूणांनाही भावला. भिन्न विचारसरणीचे पक्ष असताना सत्तेत आणले. ते फक्त साहेबच करू शकतात. त्यात ते सेनापतीची भूमिका पार पाडत आहेत. साहेबांच्या नजरेतून आत्मविश्वास निर्माण होतो.
1997 मध्ये इंदापूर शहरात आरोग्य शिबिर भरवले होते. त्यावेळी हे शिबिर सर्वांचे लक्ष वेधून घेणारे ठरले. 1999 मध्ये इंदापूर विधानसभेची निवडणूक शिवसेनेकडून लढविली होती. त्या निवडणुकीत 6 हजार मतांनी पराभव झाला होता. साहेबांनी दिल्लीला बोलावून राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करण्याच्या सूचना दिल्या. माझ्या पक्षप्रवेशावेळी साहेब स्वत: आले होते. त्यावेळी विद्या प्रतिष्ठानची मागणी केली होती. ती त्यांनी तात्काळ मंजूर करून कार्यवाही केली. स्थानिक नेत्यांना आधार देत त्याचा आर्थिक स्तर उंचावला आहे. सोलापूर राष्ट्रवादी जिल्हा निरीक्षक पदावर काम करीत होतो. त्यावेळी जुन्या आणि नव्या कार्यकर्त्यांनी साहेबांशी संवाद साधण्याची इच्छा व्यक्त केली. साहेब कामात व्यस्त असताना त्यांनी कार्यकर्त्यांना वेळ दिला. हीच त्यांची शिदोरी आहे.
समाजातील बहुजन समाजातील वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणले. यशवंत चव्हाण साहेब यांचे विचार पवार साहेबांनी खऱ्या अर्थाने तळागाळात रूजविले आहेत. सामाजिक उद्दिष्ट्ये सिद्ध केली आहेत. 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण हा त्यांचा पाया ऐतिहासिक महाराष्ट्रात भक्कम झाला आहे. त्यांच्यात कोणत्याही प्रश्नांचा वेध घेण्याची हातोटी आहे. विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंत कोणाही भेटायला गेले तर त्यांच्याशी संवाद साधून त्यांना आपलेसं केले आहे. पक्ष संघटनेत महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या जिल्हाप्रमुखांना आदराचे स्थान देऊन त्यांना बळ दिले आहे. महाराष्ट्राला बहुआयामी नेतृत्व लाभलेल्या साहेबांना वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा.
शब्दांकन :
नीलकंठ मोहिते, इंदापूर तालुका प्रतिनिधी.