2019 च्या प्रक्रियेतील उत्तीर्ण नियुक्तीच्या प्रतीक्षेत
राज्य सरकारच्या कासवगती भूमिकेमुळे टीकेची झोड
प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 21 – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत उत्तीर्ण होऊनही 1143 उमेदवारांना राज्य सरकारने नियुक्ती दिली नाही. शासनाच्या दिरंगाई भूमिकेमुळे उत्तीर्ण उमेदवार नैराश्यात जात आहे. ही नियुक्ती लवकर मिळण्यासाठी एमपीएससी उमेदवारांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. दरम्यान, उत्तीर्ण होऊनही नियुक्ती होत नसल्याने या उमेदवारांचा मात्र आता धीर सुटत असल्याची स्थिती आहे.
सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा आणि मृद व जलसंधारण विभागातील 1 हजार 145 पदासाठी जाहिरात 3 एप्रिल 2019 रोजी काढण्यात आली. त्यानंतर विविध आरक्षण व कोर्ट संबंधी प्रकरणामुळे ही प्रक्रिया लांबत गेली. दि. 10 जून 2022 रोजी या परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला. या सगळ्या प्रक्रियेसाठी तब्बल 3 वर्षेचा कालावधी लागला. स्थापत्य अभियांत्रिकी सेवा 2019 मधून शिफारस पात्र ठरलेल्या 1,143 उमेदवारांनी आता नियुक्तीसाठी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.
दरम्यान, या सर्व दिरंगाईला कंटाळून मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेला हडपसरचा स्वप्निल लोणकर या उमेदवाराने आत्महत्येचा मार्ग पत्करल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती. पण अजूनही 1143 उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली आहे. हे उमेदवार पात्र असूनही नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे संतापाची लाट पसरली आहे.
सरकारला जाग येईल का?
सर्व उमेदवारांना तत्काळ राज्य शासनाने नियुक्ती तातडीने द्यावी, या मागणीसाठी एमपीएससी उमेदवारांनी दि. 23 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. स्थापत्य अभियांत्रिकी सेवेतून निवड झालेल्यांपैकी 300 उमेदवार याठिकाणी आंदोलन करणार आहेत. ह्या निमित्ताने सरकारला जाग येईल, अशी अपेक्षा उमेदवारांकडून व्यक्त होत आहे.
93 परीक्षा केंद्रांवर सुरुळीत
एमपीएससीची राज्य सेवा पूर्व परीक्षा रविवारी शहरातील
93 परीक्षा केंद्रांवर सुरुळीतपणे पार पडली. पुणे केंद्रातून एकूण 37 हजार 850 उमेदवार परीक्षेला सामारे जाणार होते. त्यापैकी सकाळच्या सत्रात उपस्थित उमेदवारांची संख्या 31 हजार 135, तर दुपारच्या सत्रात उपस्थितांची संख्या 31 हजार 30 इतकी होती, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.