औरंगाबाद – एमपीएससी परीक्षेत अपयश आल्यामुळे 29 वर्षीय तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. आत्महत्या करण्यापूर्वी तरुणाने सुसाइड नोट लिहली असून त्यामध्ये मित्र मैत्रिणींच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे या तरुणाने नमूद केले आहे. परीक्षेत आलेल्या अपयशाची खंत आल्याची आईला बोलून तरुणाने हे टोकाचा पाऊल उचलले आहे.
किशोर भटू जाधव असे आत्महत्या करणाऱ्या 29 वर्षीय तरुणाचे नाव आहे. किशोर हा मागील 6 वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. त्याने धुळे येथे राहून दोन वर्षे तर मागील चार वर्षांपासून औरंगाबाद येथे राहून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता.
दरम्यान नुकत्याच एमपीएससी परिक्षेच्या निकालात अपयश आल्याने तो खचला होता. याबाबत त्याने आपल्या आईला फोन करून नाराजी व्यक्त केली. आईनेही अजून प्रयत्न कर, नाहीतर घरी परत ये, असा धीर दिला. पण गुरुवारी सकाळी किशोरने खोलीबाहेर गळफास घेत आत्महत्या केली आहे.
वाघाडी खुर्द येथील ग्रुप ग्राम पंचायतीचे माजी सरपंच भटू हरी जाधव यांना तीन मुले आहेत. त्यांच्या शेती हा मुख्य व्यवसाय आहे. सर्वात मोठा मुलगा विकास हा पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत आहे. तर धाकटा मुलगा नागपूर खंडपीठात लिपिक म्हणून कार्यरत आहेत. किशोर हा दुसरा मुलगा होता.
किशोरने अमरावती येथे जिल्हाधिकारी कार्यालयात वरिष्ठ लिपिक म्हणून नोकरी मिळाली होती. पण क्लास वन ऑफिसर बनण्याचं स्वप्न उराशी बाळगल्याने त्याने ही नोकरी स्वीकारली नव्हती. त्यावेळी संबंधित परीक्षेत तो 26 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला होता. पोलीस उपनिरीक्षकाची परीक्षा देखील उत्तीर्ण झाला होता. पण उंची कमी पडल्याने त्याला संधी मिळाली नाही. यातूनच त्याने हे टोकाचे पाऊल उचलले आहे.