मुंबई – एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या स्वप्नील लोणकर आत्महत्या प्रकरणावरुन राज्यात पुन्हा एकदा एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या परिक्षार्थ्यांचे प्रश्न समोर आले आहे. त्यापार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ३१ जुलै २०२१ प्रर्यंत एमपीएससीच्या सर्व रिक्त जागा भरणार असल्याची घोषणा आज सुरु झालेल्या अधिवेशनात केली आहे.
आज राज्याच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. या अधिवेशनामध्ये एमपीएससीच्या मुद्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात एमपीएससी परीक्षेचा मुद्दा उपस्थित करत अधिवेशनाच्या कामकाजात इतर सर्व प्रश्न बाजूला ठेवून आधी एमपीएससीवर चर्चा व्हावी, अशी मागणी केली.
MPSC मुद्दा आता गांभीर्याने घेतला अशून 31 जुलै 2021 पर्यंत MPSCच्या रिक्त जागा भरणार, असा निर्णय घेण्यात आला आहे. एमपीएससीच्या रिक्त जागा या ३१ जुलैपर्यंत भरण्यात येतील अशी घोषणा करण्यात आलीये. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक होईल. त्यानंतर तात्काळ या जागा भरण्यात निर्णय होऊन त्या भरल्या जातील, अशी माहिती यावेळी अजित पवार यांनी दिली.
एमपीएससीच्या तब्बल ३ हजार नियुक्त्या, मुलाखती रखडल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. आयोगावरील सदस्यांच्या रखडलेल्या नेमणुका मराठा आरक्षण यामुळे लाखो उमेदवारांचं भवितव्य अधांतरी आहे, असा आरोप करण्यात येत होता.तीन वर्षांपासून राज्य सेवा परीक्षा-२०१९ सोबत स्थापत्य अभियांत्रिकी, पशुधन विकास अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक, प्रादेशिक परिवहन अधिकारी अशा २९९६ पदांसाठी हजारो उमेदवारांच्या मुलाखती आणि मुख्य परीक्षा रखडल्या आहेत.
MPSC हे मायाजाल आहे असं म्हणत एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या स्वप्नील लोणकर या तरुणानं पुण्यात आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी स्वप्नीलने लिहिलेल्या सुसाईड नोटमधे आर्थिक परिस्थितीला कंटाळून आणि एमपीएससीची परीक्षा प्रक्रिया रखडल्याने आत्महत्या करत असल्याच म्हटलं आहे. स्वप्नीलने 2019 आणि 2020 मधे झालेली एमपीएससीची मुख्य परीक्षा उत्तीर्ण होत यश मिळवलं होतं. पण पुढे या परीक्षांचाच भाग असलेली तोंडी परीक्षा दीड वर्ष झालीच नाही.