पुणे – मराठा आंदोलकांच्या विरोधानंतर राज्य सरकारने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) येत्या रविवारी (दि.11) होणारी परीक्षा अखेर पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘एमपीएससी’ची परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात येत असल्याची शुक्रवारी घोषणा केली. ही परीक्षा कधी होणार आहे, याचा निर्णयही लवकरच घेण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
मराठा आरक्षणाच्या अंतरिम स्थगितीनंतर ‘एमपीएससी’ची पूर्व परीक्षा येत्या रविवारी होणार होती. स्थगिती दिल्यामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे नुकसान होणार असल्याने ही परीक्षा पुढे ढकलावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मराठा आंदोलकांनी दिला होता.
त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यात ‘एमपीएससी’ची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय झाला. परीक्षा दोन दिवसांवर असताना ही परीक्षा होणार की नाही, अशा संभ्रमात असलेल्या उमेदवारांचा अखेर तिढा सुटला आहे. करोना पार्श्वभूमीवर ही परीक्षा दोनदा आणि मराठा आंदोलकांच्या विरोधामुळे एकदा अशा तीनदा पुढे ढकलावी लागली आहे.
दरम्यान, करोना आणि लॉकडाऊनचे संकट होते. काही प्रमाणात अजूनही आहे. त्यामुळे आम्ही एक सारासार विचार केला. विद्यार्थ्यांना अभ्यासाला वेळ मिळाला पाहिजे हा विचार आम्ही केला. त्यामुळे आम्ही ही परीक्षा पुढे ढकलत आहोत. परीक्षा कधी होणार याचा निर्णयही लवकरच घेतला जाणार असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
एकही उमेदवार अपात्र ठरणार नाही
‘एमपीएससी’ परीक्षेची तारीख सध्या आम्ही पुढे ढकलली आहे. मात्र, यापुढे जी तारीख ठरेल त्या तारखेत बदल केला जाणार नाही. मराठा समाजाकडूनही आम्हाला परीक्षा पुढे ढकला अशी विनंती केली होती.
आता जे उमेदवार परीक्षेला पात्र आहेत. तेच उमेदवार जेव्हा परीक्षा जाहीर होईल, तेव्हा त्या परीक्षेसाठी एकही उमेदवार अपात्र ठरणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
परीक्षा वेळेत होऊ देण्याचे भुजबळांनी केले होते आवाहन
‘एमपीएससी’ची परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार होऊ द्यावी, अशी भूमिका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी शुक्रवारी मांडली होती. ही परीक्षा देणाऱ्या उमेदवारांमध्ये मराठा समाजासह अन्य समाजाचेही उमेदवार आहेत.
त्यामुळे उमेदवारांचे नुकसान होऊ नये, यासाठी ही परीक्षा वेळेत घेण्यात यावेत, असे आवाहन भुजबळ यांनी मराठा नेत्यांना केले होते. त्यानंतरही ही परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय झाला.