मुंबई : करोना रुग्णांची वाढती संख्या आणि राज्यात निर्माण झालेल्या लॉकडाऊनच्या स्थितीमुळं एमपीएससीची नियोजीत परीक्षा पुढं ढकण्यात आली आहे. तर शालेय विद्यार्थ्यांनाही दिलासा देण्यात आला आहे. मात्र दहावी-बारावीच्या परीक्षेसंदर्भात तर्कवितर्क लावले जात आहेत. या परीक्षेसंदर्भात आता सरकारकडून संकेत मिळत आहे.
दहावी आणि बारावीच्या (10th and 12th Exam) परीक्षा ठरलेल्या वेळेतच होणार आहेत. गेल्या काही दिवसात या मुद्द्यावर अनेक चर्चा झडत होत्या. मात्र आता ठरल्या तारखेलाच परीक्षा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिक्षण मंत्र्यांबरोबरच्या बैठकीत याबाबत चर्चा सुरू आहे. 10 वी आणि 12 वी च्या परीक्षा ठरल्याप्रमाणेच घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
येत्या 29 एप्रिल रोजी दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू होते आहे. या परीक्षेसाठी राज्यभरातून एकूण 16 लाख विद्यार्थी बसणार आहेत. तर बारावीच्या परीक्षेसाठी 14 लाख विद्यार्थी बसणार आहेत, बारावीची परीक्षा 23 एप्रिलपासून सुरू होणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन परीक्षासाठी यंत्रणा उभी करणं सहज शक्य नाही. तसेच एवढ्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन परीक्षेची व्यवस्था करण्यासाठी किमान २ वर्षे लागतील. त्यामुळं सरकार ऑफलाईन परीक्षा घेण्यासंदर्भात सकारात्मक असल्याचे समजतं.