पुणे – राज्यातील वाढता करोना संसर्ग पाहता विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी येत्या रविवारी (ता. 11 एप्रिल) रोजी होणारी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामधून ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली जात होती. काही परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी देखील परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी दीड वाजताच्या सुमारास तातडीच्या बैठकीत सर्वानुमते परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परीक्षेची पुढील तारीख निर्णय घेऊन कळवण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.
गेल्या वेळीही एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र त्यावेळी विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणत एकत्र येत आंदोलन करून प्रशासनाला परीक्षा घेण्यास भाग पाडले होते. मात्र त्यावेळीपेक्षा करोना संसर्गाची सध्याची परीस्थिती अत्यंत भयंकर आहे. त्यामुळे यावेळीही विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन आंदोलन करू नये यासाठी पुण्यातील शास्त्रीरोड येथे पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानंतर विद्यार्थ्यांकडून समिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काही विद्यार्थ्यांनी सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. तर काही विद्यार्थ्यांनी परीक्षा व्हावी अशी भूमिका घेतली आहे.