नगर, दि.21 – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी राज्य सेवा (पूर्व) परीक्षा आज जिल्ह्यातील एकूण 51 उपकेंद्रांवर घेण्यात आली. या परीक्षेसाठी 15 हजार 884 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 6 हजार 365 विद्यार्थी गैरहजर राहिले. 9 हजार 505 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. या दरम्यान कुठला ही अनुचित प्रकार घडला नसल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी तथा केंद्रप्रमुख संदीप निचित यांनी सांगितले.
आज रविवारी (दि.21) सकाळी 10 ते दुपारी 12 आणि दुपारी 3 ते सायंकाळी 6 या वेळेत परीक्षा झाली. उमेदवारांना परीक्षा उपकेंद्रांवर सकाळी 8-30 वाजता प्रवेश देण्यात आला. उमेदवारांना आयोगाने दिलेले विहित ओळखपत्र सोबत आणणे अनिवार्य होते. करोनाच्या नियमांचे पालन करून विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. ही परीक्षा दोन सत्रात घेण्यात आली.
पहिल्या सत्रात 15 हजार 884 पैकी, 9 हजार 505 विद्यार्थी हजर होते. यामध्ये 6 हजार 343 विद्यार्थी गैरहजर होते. तर दुपारच्या सत्रात 15 हजार 884 पैकी 9 हजार 483 विद्यार्थी हजर होते. तर 6 हजार 365 विद्यार्थी गैरहजर होते. तसेच यावेळी एकही विद्यार्थी करोना पॉझिटिव्ह आढळला नसल्याचे ही त्यांनी सागितले.
तसेच उमेदवारांना एकमेकांचे पेन, लिखाण साहित्य इत्यादी वापरण्यास, परीक्षेच्या दोन सत्राच्या मधल्या वेळेमध्ये उमेदवारांना परीक्षा केंद्राबाहेर जाण्यास व परीक्षा कक्षात/ परीक्षा केंद्राच्या परिसरात मोबाइल, कॅल्क्युलेटर, डिजीटल डायरी, पेजर, मायक्रोफोन इत्यादी सारखी दूरसंचार साधने आणण्यास आणि स्वताजवळ बाळगण्यास मनाई करण्यात आली होती.
या प्रक्रीयेसाठी नियुक्त अधिकारी-कर्मचारी तसेच परीक्षेसाठी प्रविष्ट होणार्या उमेदवारांनी कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या सर्व उपाययोजनांचे पालन करणे तसेच मास्क, हातमोजे, सॅनिटायझर जवळ बाळगणे अनिवार्य होते. तसेच परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी 1 हजार 638 अधिकारी – कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आले होते.