– रवींद्र देशमुख
पुणे – महाराष्ट्रात करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून दररोज ५० हजार रुग्ण आढळून येत आहे. या पार्श्वभूमीवर शालेय विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र येत्या रविवारी (ता. 11) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्वपरीक्षा होणार आहे. या परीक्षेला राज्यात ४ लाखाहून अधिक विद्यार्थी बसणार आहेत. मात्र करोनाची स्थिती पाहता विद्यार्थ्यांनाच रविवारी होऊ घातलेली परीक्षा नकोय.
पुण्यात करोनामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. अनेक विद्यार्थी करोनाबाधित आहे. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येते आहे. परंतु, परीक्षा ठरलेल्या दिवशीच होईल, असं आयोगानेच्या स्पष्ट केले आहे.
श्रीगोंदा येथील वैभव शितोळे या विद्यार्थ्याचं करोनामुळे निधन झालं. तर प्रीतम कांबळे हा विद्यार्थी देखील करोनामुळेच दगावला. अनेक विद्यार्थी करोना बाधित असून काही क्वारंटाईन आहे. त्यामुळे परीक्षा झाल्यास करोनाचा प्रसार अधिक वेगाने होण्याची शक्यता आहे. त्यातच शनिवारी आणि रविवारी कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यास अडचण येण्याची शक्यता आहे.
पुण्यात करोनामुळे दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. अनेक विद्यार्थी बाधित आहे. तर काही विद्यार्थी क्वारंटाईनच्या भीतीने चाचणी करत नाहीत. अशा स्थितीत परीक्षा घेतल्यास करोनाचा प्रसार झपाट्याने होऊ शकतो. तसेच शनिवारी-रविवारी लॉकडाऊन असल्यामुळे बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना परीक्षा सेंटरवर पोहोचण्यास अडचणी येऊ शकतात.त्यामुळे परीक्षा लांबवावी.
राहूल कुलकर्णी ( विद्यार्थी, जालना)
पुण्यातील अनेक विद्यार्थी करोना बाधित आहे. हेच विद्यार्थी परीक्षा देण्यास आले तर इतरांना करोनाची बाधा होऊ शकते. तसेच करोनाचा वाढता प्रसार पाहता अभ्यासावरही लक्ष केंद्रीत करता आलेलं नाही. त्यामुळे परीक्षा पुढं ढकलाव्यात.
– महेश भनगे (विद्यार्थी, नेवासा)