पुणे – गेल्या अनेक महिन्यांपासून “महाराष्ट्र लोकसेवा आयोगा’च्या (एमपीएससी) रिक्त असलेल्या चार सदस्यांची नियुक्तीची प्रक्रिया राज्य शासनाने सुरू केली आहे. त्यामुळे आता “एमपीएससी’च्या कारभाराला गती मिळण्याची चिन्हे आहेत.
राज्य शासनाच्या विविध विभागांत अधिकाऱ्यांची निवड करणाऱ्यांसाठी “एमपीएससी’ ही स्वायत्त संस्था आहे. त्याचा एक अध्यक्ष व पाच सदस्यांद्वारे संस्थेचे काम चालते. सध्या अध्यक्ष म्हणून सतीश गवई आणि दयानंद मेश्राम हे एकमेव सदस्य कार्यरत आहेत. तर इतर सदस्यांची चार पदे रिक्त आहेत. सदस्यांची पदे रिक्त असल्याने त्याचा परिणाम अनेक परीक्षांच्या निकालावर होत आहे. परीक्षेचे वेळापत्रक, परीक्षेचे नियोजन व तयारी आणि त्याचा निकाल वेळेत लागणे महत्त्वाचे आहे. पण आयोगाच्या चार सदस्य रिक्त असल्याने त्याचा फटका सर्व स्पर्धा परीक्षेच्या कामकाजावर होत आहे.
तसेच, उमेदवारांच्या भरती प्रक्रियेतील मुलाखती किंवा शारिरीक चाचणीच्या वेळेस अध्यक्ष व सदस्य यांच्यापैकी एक प्रतिनिधी तेथे उपस्थित असणे आवश्यक आहे. आयोगाचे कामकाज वेळेत होण्यासाठी या सदस्यांची भूमिका महत्त्वाची असते. यासाठी सामान्य प्रशासन विभागाने सदस्य निवडीसाठी अर्ज मागविले आहेत. 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे, असे उपसचिव गीता कुलकर्णी यांनी सांगितले.