सातारा – गेल्या अनेक वर्षांपासून आनेवाडी टोल नाक्याचा प्रश्न गाजत आहे. रस्ते दुरुस्ती व स्थानिकांसाठी टोलमाफी या प्रश्नांमध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित ठेकेदार जिल्हा प्रशासनाला जुमानत नाही, ही वस्तुस्थिती आहे. टोलबाबत खा. उदयनराजेंनी घेतलेली भूमिका रास्त आहे. खेड-शिवापूर टोल नाक्याबाबत खा. सुप्रिया सुळे यांनी आंदोलनाची भूमिका घेऊन एमएच-12 व एमएच-14 पासिंग असलेल्या वाहनांसाठी टोलमाफी करून घेतली.
त्याच पद्धतीने खा. उदयनराजे व खा. श्रीनिवास पाटील यांनी आनेवाडी आणि तासवडे या टोलनाक्यांवर एमएच-11 व एमएच-50 पासिंग असलेल्या वाहनांसाठी टोलमाफी मिळवावी. त्यासाठी वेळप्रसंगी आंदोलन करावे लागले, तर मी खासदारांसोबत आहे, असे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्पष्ट केले आहे.
टोलमाफीबाबत उदयनराजेंनी नुकतीच आपली भूमिका स्पष्ट केली होती. आ. शिवेंद्रसिंहराजेंनी या भूमिकेचे स्वागत केले आहे. याबाबतच्या प्रसिद्धीपत्रकात आ. शिवेंद्रराजे यांनी म्हटले आहे की, महामार्ग व सेवा रस्त्यांची दुरवस्था, स्थानिकांसाठी टोल सवलत या प्रश्नांवर वारंवार आंदोलने झाली आहेत. टोल नाकी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारित असल्याने संबंधित अधिकारी व ठेकेदार जिल्हा प्रशासनाला अजिबात जुमानत नाहीत. जिल्हा प्रशासनाने बोलावलेल्या बैठकीला ते उपस्थित रहात नाहीत.
त्यामुळे जिल्हा प्रशासन हे प्रश्न सोडवू शकत नाही. खेड-शिवापूर येथील टोल नाक्यावर स्थानिकांना टोलमाफी मिळण्यासाठी आंदोलनाचा पवित्रा घेऊन खा. सुप्रिया सुळे यांनी हा प्रश्न स्वत:च्या पातळीवर सोडवला. टोल नाका म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण आहे. तेथे बोगस पावत्यांद्वारे सुरू असलेला भ्रष्टाचार नुकताच उघड झाला.
हा भ्रष्टाचार बंद होऊन स्थानिकांच्या वाहनांना टोलमाफी मिळणे अत्यावश्यक आहे. सातारच्या दोन्ही खासदारांनी आनेवाडी व तासवडे टोल नाक्यांवर एमएच-11, एमएच-50 पासिंग असलेल्या वाहनांना टोलमाफी मिळण्यासाठी कठोर भूमिका घ्यावी. त्यासाठी आंदोलन करावे लागल्यास त्यात सहकार्य करू, असे आ. शिवेंद्रराजे यांनी म्हटले आहे.