नवी दिल्ली : खासदार वरुण गांधी पक्षनेतृत्वावर नाराज असल्याने भाजपला सोडचिठ्ठी देणार असल्याचे म्हटले जात आहे. पक्षाला रामराम करत वरुण ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. ममता बॅनर्जी आजपासून दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यांमध्ये ममता बॅनर्जी आणि वरुण गांधी यांची भेट होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या भेटीमध्ये वरुण गांधी टीएमसीमध्ये प्रवेश कऱण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून वरुण गांधी यांनी पक्षावरील आपली नाराजी जाहीरपाने अनेकदा व्यक्त केली. सोशल मीडियावर वरुण गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या धोरणावरही टीका केली. केंद्र सरकारकडून घेतले गेलेले निर्णय तसेच पक्षाच्या धोरणांविरोधात ते सातत्याने टीका करत आहेत. त्यामुळेच वरुण गांधी हे लवकरच भाजपाला रामराम करुन तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
खासदार वरुण गांधी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या संपर्कात आहेत. आजपासून तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान, वरुण गांधी त्यांची भेट घेणार असून, त्यात तृणमूलमधील प्रवेशाबाबतची चर्चा पुढे सरकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
केंद्र सरकारच्या कॅबिनेट विस्तारामध्ये स्थान न मिळाल्याने वरुण गांधी नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच वरुण गांधी आणि त्यांची आई मनेका गांधी यांना पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून बाहेर काढण्यात आले होते. तेव्हापासून वरुण गांधी पक्षावर नाराज आहेत.