कोंढवा, दि. 27 (प्रतिनिधी) -बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन येऊन गेल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनीही मतदारसंघातील संपर्क आणखी वाढविला आहे. बारामती मतदारसंघातील पूर्व हवेली पट्ट्यांतील गावभेटींवर “ताईंनी’ मोठा भर दिला आहे. लोकसभा निवडणुकीत याच गावांतून त्यांना मतांचे मोठे “लीड’ मिळत असते. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना सूचना देत येथील परिसरावर लक्ष केंद्रीत केले आहे.
हवेली तालुक्याच्या पूर्व पट्ट्यांतील फुरसुंगी, उंड्री, पिसोळी, कोंढवा, कात्रज या परिसरात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व आहे. परंतु, गेल्या दोन-तीन वर्षांत अन्य पक्षांनीही या परिसरावर मोठे लक्ष केंद्रित केले आहे. यातून राष्ट्रवादीला आव्हान निर्माण होऊ शकते, अशी स्थिती असतानाच भाजपच्या केंद्रीयमंत्री निर्मला सीतारामन यांनी या मतदार संघाचा दौरा केल्यानंतर भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मोठा उत्साह संचारला आहे. काहीही करून 2024ची बारामती लोकसभा जागा जिंकायचीच, असा ठाम निर्धार करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपकडून या पट्ट्यांतील गावात विविध सामाजिक कार्यक्रमांसह अन्य उपक्रमांवरही भर दिला जात आहे. याच कारणातून खासदार सुप्रिया सुळे आपल्या मतदार संघातील भेटी-गाटी वाढविल्या आहेत. गेल्या दोन दिवसांचेच शेड्युल पाहता.., रविवारी (दि.25) सुळे यांनी उंड्री परिसरातील सोसाट्यांमधून तब्बल 13 ठिकाणी धावत्या भेटी दिल्या. सोमवारी (दि. 26) सुळे यांनी पहिल्यांदाच एकाच दिवसी तब्बल 13 गावांना भेटी दिल्या आहेत.
टीकेचेही खंडन अतिशय विनम्रपणे…
हवेलीच्या या पट्ट्यांत त्यांचे सातत्यान येणे-जाणे असले तरी सीतारामन बारामतीत येऊन गेल्यानेच सुप्रिया सुळे यांनी मतदारसंघातील दौरे वाढविले असल्याची टीका त्यांच्या या मॅरेथॉन दौऱ्यावर विरोधक करू लागले आहेत. पण, या टीकेचेही खंडन अतिशय विनम्रपणे सुळे यांनी केले. टीका करणे हे तर विरोधकांचे कामच आहे, मी माझ्या मतदारांसाठी फिरते आहे, त्यांची कामं करीत आहे, अशी स्पष्ट प्रतिक्रिया सुळे यांनी दिली आहे.