खासदार बारणे; नुकसानीची घेतली माहिती
वडगाव मावळ – अतिवृष्टीमुळे बाधीत सर्व शेतकऱ्यांना पूर्णपणे आर्थिक मदत मिळाली पाहिजे. कुणीही शेतकरी वंचित राहता कामा नये, अशा सूचना मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
मावळ तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भातशेती व अन्य पिकांच्या नुकसानीचा आढावा गुरुवारी (दि. 14) खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत मावळ तहसील कार्यालयात घेतला. या वेळी तहसीलदार मधुसुदन बर्गे, तालुका कृषी अधिकारी देवेंद्र ढगे, गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी, कृषी व महसूल विभागाचे अधिकारी, जिल्हा प्रमुख गजानन चिंचवडे, तालुका प्रमुख राजू खांडभोर व शेतकरी उपस्थित होते.
मावळ तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भातशेती केली जाते. या वेळी अतिवृष्टीमुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. याबाबत खासदार श्रीरंग बारणे यांनी स्वतः 4 नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष जागेवर जात भातशेतीच्या नुकसानीची पाहणी केली होती. त्यानंतर तत्काळ पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना मदत करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर खासदार बारणे यांनी तहसील कार्यालय वडगाव मावळ येथे बैठक घेऊन पिकांच्या नुकसानीचा आढावा घेतला.
मावळ तहसीलदार मधुसुदन बर्गे म्हणाले की, पीक नुकसानीसंदर्भातील संपूर्ण अहवाल राज्य शासनाकडे पाठविला आहे. बाधित शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत मिळेल. तसेच आपण दिलेल्या सूचनांचा आदर करून योग्य ती कारवाई केली जाईल.
मावळातील 2 हजार 79 शेतकऱ्यांचा पीकविमा –
मावळ तालुक्यामध्ये बाधीत 178 गावे असून, बाधीत शेतकऱ्यांची संख्या 12 हजार 714 आहे. यामध्ये 5391.18 हेक्टर क्षेत्रावर भातशेती आहे. 4.57 हेक्टर जागेवर भुईमूग 0.20 हेक्टर फूल पिके, 38.97 हेक्टर सोयाबीन व 1.87 हेक्टर अन्य पिकाचे नुकसान झाले आहे. लागवडीतील जवळपास 33 टक्के पेक्षा जास्त विविध पिकांचे नुकसान झाले आहे. या बाधित शेतकऱ्यांना शासन निर्णय 29 ऑगस्ट 2019 नुसार हेक्टरी 20 हजार 400 रुपयेनुकसान भरपाई मिळणार आहे.
या संपूर्ण नुकसानीची भरपाई 110 कोटी 91 लाख 516 रूपये मिळणार आहे. यामध्ये 2 हजार 79 शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. त्यातील अंदाजे विमा नुकसान क्षेत्र 543.76 इतके असून, त्यामध्ये कर्जदार 498.76 आहेत. तर बिगर कर्जदार अवघे 45 आहेत. या सर्व विमाधारक शेतकऱ्यांना त्यांची पूर्ण नुकसान भरपाई मिळणार आहे.