औरंगाबाद – राज्यभरात करोना संसर्ग झपाट्याने वाढत असून रुग्णसंख्या दररोज हजारांमध्ये वाढत आहे. औरंगाबादेत देखील रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने येथे लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र हा निर्णय रद्द करण्यात आला आहे. हा निर्णय रद्द झाल्याच्या आनंदात येथील खासदार इम्तियाज जलील यांनी विजयी मिरवणूक काढून करोना नियम धाब्यावर बसवले. त्यामुळं त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
औरंगाबाद शहरातीस लॉकडाऊनच्या निर्णयाला जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी स्थगिती दिली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी आणि खासदार इम्तियाज जलील यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. इम्तियाज जलील यांना खांद्यावर बसून मिरवणूक काढण्यात आली होती. पण या मिरवणुकीत कोणीही तोंडावर मास्क वापरला नव्हता. तसंच सोशल डिस्टन्सिंगच्या नियम पायदळी तुडवण्यात आले होते.
या संदर्भात भाजपचे नेते संजय केनेकर आणि इतर पदाधिकाऱ्यांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. त्यानंतर इम्तियाज जलील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.