पुणे: वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांच्यात जागावाटपावरून बिनसले असून आता एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या तोफा टाकण्यास सुरवात झाली आहे. “एमआयएमचे इम्तियाज जलील म्हणजे नाकापेक्षा मोती जड” आसा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सचिन माळी यांनी केला आहे.
ते म्हणाले की, खासदार इम्तियाज जलील यांनी वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएममध्ये फुट पाडण्याचा प्रयत्न केला आहे. एमआयएम’चे अध्यक्ष असदुद्दिन ओवेसी यांच्यासोबत अजूनही जागावाटपाची चर्चा सुरू आहे. एमआयएमकडून अधिकृतपणे केवळ १७ जागांचा प्रस्ताव आला आहे. यापुर्वी कधीही शंभर जागा मागितल्या नाहीत. त्यामुळे एवढ्या जागांविषयी चर्चा झालेली नाही. असे माळी यांनी स्पष्ट केले आहे.
तसेच जलील यांनी त्यांच्या वैयक्तिक महत्वाकांक्षेतून स्वतच्या लेटर हेडवर आघाडीतून बाहेर पडत असल्याचे जाहीर केले आहे. त्यांची भुमिका म्हणजे एमआयएमची भुमिका नाही. तसेच प्रकाश आंबेडकर आणि ओवेसी यांच्यामध्ये चांगला समन्वय आहे. मुस्लिमांसह सर्व समाजाला योग्यपध्दतीने प्रतिनिधित्व दिले जाणार आहे. पण जलील यांच्याकडून फुट पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे माळी म्हणाले.
दरम्यान आघाडीकडून एमआयएमला केवळ सात जागा मिळत असल्याने इम्तियाज जलील यांनी शुक्रवारी आघाडी तुटल्याचे जाहीर केले. त्यामुळे आघाडीला मोठा झटका बसला असल्याच बोलले जात आहे.