पुणे: “वस्तू आणि सेवा कर(जीएसटी) लागू होऊन बराच कालावधी उलटला आहे, तरी अद्याप तुम्ही स्वस्थ का? या कराचा वाटा मिळत नाही, तर तुमच्या हक्कासाठी तुम्ही न्यायालयात का नाही गेले? असे प्रश्न उपस्थित करत खासदार गिरीश बापट यांनी कन्टोन्मेंट च्या लोकप्रतिनिधींची कानउघडणी केली.
पुणे कन्टोन्मेंट बोर्डाची सर्वसाधारण सभा शुक्रवारी संपन्न झाली. बोर्डाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, लोकप्रतिनिधी आणि आमदार यांच्या उपस्थित पार पडलेल्या या सभेदरम्यान बापट यांनी कन्टोन्मेंट च्या विविध प्रश्नांसंदर्भात आढावा घेतला. यावेळी बोर्डाच्या आर्थिक स्थितीबाबत भाष्य करताना, त्यांनी जीएसटी कराचा वाटयाबाबत भाष्य करत बोर्डाच्या जीएसटीच्या वाटयासाठी तुम्ही न्यायालयात का नाही गेला? असा प्रश्न बापट यांनी विचारला असता, सरकारविरोधात दावा करायला नको, म्हणून आम्ही दावा दाखल केला नाही, असे लोकप्रतिनिधींनी सांगितले. यावर बापट यांनी लोकप्रतिनिधींची कानउघडणी करत| सरकार महत्वाचे की तुमचे हक्क महत्वाचे असा प्रश्न विचारला. तसेच वारंवार अर्ज करूनही जर तुमचा प्रश्न सुटत नसेल तर तुम्ही न्यायालयात दावा दाखल करायलाच पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
राज्य आणि केंद्र सरकारच्या वित्त सचिव आणि वित्त मंत्री यांच्याशी याबाबत चर्चा करून जीएसटी’च्या वाट्याबाबत प्रश्न मांडणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.