खासदार डॉ. कोल्हेंचा आमदार गोरेंना सवाल
आळंदी – सत्तेत असतानाही शिवसेनेच्या आमदारांनी खेडचा विकास केला नाही. तीर्थक्षेत्र आळंदीत पिण्यासाठी शुद्ध पाणी नाही, कचरा व्यवस्थापन नाही, अंतर्गत रस्ते नाही, भाविकांसाठी आरक्षित दर्शनबारी जागेचे आरक्षण उठवले… तुम्ही करता तरी काय? याउलट दहा वर्षांत दिलीप मोहिते पाटील यांनी केलेला तालुक्याचा विकास जनतेला माहित आहे. यावेळी माझ्या मायबाप जनतेने निवडणूक हातात घेतली असल्याचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले.
खेड-आळंदी विधानसभा मतदासंघातील महाआघाडीचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार माजी आमदार दिलीप मोहिते यांच्या प्रचाराची सांगता सभा शनिवारी (दि. 19) आळंदी येथील सभेत झाली, त्यावेळी खासदार डॉ. कोल्हे बोलत होते. याप्रसंगी उमेदवार दिलीप मोहिते-पाटील, भगवानराव वैराट, बाबा राक्षे, रामदास ठाकूर, ऋषिकेश पवार, बाळशेठ ठाकूर, बबनराव कुऱ्हाडे, डी. डी. भोसले, प्रकाश कुऱ्हाडे, संदीप नाईकरे, निलम येळवंडे, निर्मला पानसरे, दीपाली काळे, अरुण चांभारे, राजाराम लोखंडे, अरुण चौधरी, वंदना सातपुते, सचिन घुंडरे, रुपाली पानसरे, नंदकुमार वडगावकर, योगेश सातपुते, गौरी गोळे, पुष्पा कुऱ्हाडे, बाबू लोहार आदिंसह मोठ्या संख्येने आळंदीकर उपस्थित होते.
भगवानराव वैराट म्हणाले की, सत्ताधाऱ्यांनी दिनदलितांना खाईत टाकले. यावर उपाय म्हणून आघाडीचे मोहितेच आमदार पाहिजेत. रामदास ठाकूर, बाबा राक्षे, प्रकाश कुऱ्हाडे, डी डी भोसले, वंदना सातपुते आदींनी भाषणे करून मोहितेंना निवडून आणण्याचे आवाहन केले. दरम्यान वारकरी संप्रदाय, व्यापारी संघटनेने मोहितेंना पाठिंबा दिला. तर परिसरातील अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
भाजपकडून शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न -मोहिते
खेड तालुक्यात पाच वर्षे भाजप व शिवसेना मांडीला-मांडी लावून विकास केला सांगत होते; मात्र विधानसभा निवडणूक जाहीर होताच एकमेकांनी तालुक्याची कशी वाट लावली हे सांगत सुटले आहेत. तर आम्ही काय बोलायचे? भाजप व शिवसेनेची खरी युती झाली नसून भाजप शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न करीत आहे. निष्क्रिय आमदारांनी आळंदीच्या विकासासाठी एक रुपयांचाही निधी दिला नाही. त्यामुळे आळंदीच्या विकासासाठी संधी द्या, अशी साद उमेदवार माजी आमदार दिलीप मोहिते यांनी मतदारांना घातली.