पुण्यात अभूतपूर्व गर्दीनंतर समर्थकांची भावना ः गर्दी जमविण्यासाठी सेलिब्रिटीची गरज नाही
“पार्थ’साठी डॉ. कोल्हेंना एकटे पाडणार का?
शिरूर लोकसभेच्या लढाईचा बिगुल वाजल्यानंतर कालच्या पहिल्याच चढाईत खासदार आढळराव पाटील यांनी आघाडी घेतली असल्याचे यातून स्पष्ट झालेच, पण पार्थ पवार यांच्यासाठी मावळला सगळी कुमक पाठवून डॉ. कोल्हे यांना एकटे पाडणार का? हा प्रश्नही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पडला आहे. सर्वच पक्षाचे कार्यकर्ते लोकसभा निवडणुकीत खासदार आढळरावांना मतदान करतात हा आजवरचा अनुभव आहे. त्यात राष्ट्रवादीने पार्थ पवार यांची जागा प्रतिष्ठेची केल्याने शिरूरमधून महत्त्चाचे नेते डॉ. कोल्हे यांच्या प्रचारात फारसे दिसत नसल्याने कार्यकर्ते संभ्रमात असल्याचे सध्याचे चित्र आहे. तसे झाले तर आढळराव पाटीलांना विजयाचा “चौकार’ मारण्यापासून कोण रोखणार? हा प्रश्न महत्त्वाचा आहे.
पुणे -‘खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हेच शिरूर मतदारांचे “स्टार’ आहेत. त्यांना गर्दी जमविण्यासाठी सेलिब्रिटीची गरज नाही’अशा प्रतिक्रिया काल दिवसभर नरपतगिरी चौकात आलेल्या त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केल्या.
शिवसेना-भाजप-रिपाइं-रासप-शिवसंग्राम महायुतीचे उमेदवार खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सकाळी 10 वाजल्यापासूनच गटागटाने लोकं जमायला सुरूवात झाली होती.
नरपतगिरी चौकातील व्यासपीठाजवळ उभी असलेली बैलगाडी व दिमाखदार बैलजोड्या येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष वेधून घेत होती. गळ्यात भगवे स्कार्फ, डोक्यावर भगव्या टोप्या घालून भर उन्हात अंगाची काहिली होत असतानाही जथ्याजथ्याने येणाऱ्या महायुतीच्या कार्यकर्त्यांनी व बैलगाडा मालक शेतकऱ्यांनी खासदार आढळराव पाटील यांचा उमेदवारी अर्ज दा खल करण्यासाठी हजारोंच्या संख्येने गर्दी केली होती. आढळराव दादा हेच आम्हा बैलगाडा मालक शेतकऱ्यांचे “हिरो’ आहेत. त्यांना गर्दी जमविण्यासाठी सेलिब्रिटींची गरज नाही. त्यांच्या एका हाकेवर हजारो आम्ही बैलगाडा मालक राज्यात कुठेही जायला तयार असतो, अशा प्रतिक्रिया आम्हाला ऐकायला मिळाल्या.
खासदार आढळराव पाटील यांच्या विक्रमी मताधिक्य देण्यासाठी भाजपचे आमदार योगेश टिळेकर, महेश लांडगे आणि बाबुराव पाचर्णे यांच्यात चुरस लागल्याचे चित्र पाहिल्यावर पालकमंत्री गिरीश बापट यांनी आपल्या भाषणात आढळराव पाच लाखांपेक्षा अधिक मतांनी विजयी होतील, असे भाकित वर्तवताच उपस्थितांनी “एकच वादा शिवाजी दादा’ असा जल्लोष केला. या तुलनेत आपल्या उमेदवाराला वाऱ्यावर सोडून राष्ट्रवादीचे नेते व बहुतेक कार्यकर्ते मावळला गेल्याने डॉ. अमोल कोल्हे एकटे पडल्याचे जाणवत होते. गर्दी जमविण्यासाठी त्यांची “स्टार सेलिब्रिटी’ची प्रतिमाही कामी आली नाही हे मिळालेल्या अल्प प्रतिसादामुळे दिसून आले.