नवी दिल्ली – राष्ट्रीय पातळीवर यूपीए बळकट होण्यासाठी कॉंग्रेसच्या बाहेरील व्यक्तीकडे दिले पाहिजे. शरद पवार हे अशी क्षमता असलेले नेते आहेत, असे विधान संजय राऊत यांनी केले आहे. तसेच दिल्लीतील काही लोक युपीए-2 स्थापन करण्याच्या तयारीत असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे.
नवी दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, शरद पवार या देशाचे नेते आहेत. शरद पवार, उद्धव ठाकरे काय आहेत हे सर्वांना माहिती आहे. युपीएसंबंधी बोलण्यासाठी युपीएमध्ये असायला पाहिजे असे काही नाही. युपीए राज्याचा विषय नाही. त्यामुळे राज्यातील, जिल्हा स्तरावरील लोकांनी केंद्रीय विषयावर बोलू नये. हा राष्ट्रीय विषय असून राष्ट्राच्या हितासाठी या देशात एका मजबूत विरोधी पक्षाची आघाडी स्थापन व्हायची असेल तर मी सांगितलेल्या भूमिकांवर चर्चा होणे गरजेचे आहे. हे जर महाराष्ट्रातील नेत्यांना कळत नसेल तर त्यांनी राजकीय अभ्यास करणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.
हा दिल्लीतील चर्चेचा विषय असून महाराष्ट्र किंवा इतर राज्यांमध्ये ती होऊ नये. राष्ट्रीय विषय दिल्लीत चर्चिला जातो आणि तिथेच झाली पाहिजे. या विषयावर सोनिया गांधी, राहुल गांधी बोलणार असतील तर आम्ही त्यांना उत्तर देऊ. पण ते सुद्धा या विषयावर काही बोलत नसून चिंतन करत आहेत, असेही ते म्हणाले.