पारनेर – राज्यात 3 सप्टेंबरपासून आशा व गट प्रवर्तकांचे कामबंद आंदोलन सुरू आहे. मात्र शासनाकडून मागण्यांना प्रतिसाद मिळत नसल्याने आशा व गटप्रवर्तकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले आहे. त्या आंदोलनाचा भाग म्हणून आज पारनेर येथे महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर मूक आंदोलन करण्यात आले.
सकाळी अकरा वाजता महात्मा फुले यांच्या पुतळ्या समोर तोंडावर काळी पट्टी बांधून आंदोलन सुरू करण्यात आले. दुपारी दोन वाजता तालुक्याच्या दौऱ्यावर आलेल्या खासदार डॉ. सुजय विखे यांना निवेदन देण्यात आले. राज्य शासनाने मानधन वाढीचे दिलेले आश्वासन आचारसंहिता लागू होण्यापूर्वी पूर्ण करण्याची प्रतीक्षा आंदोलक करित आहेत. अनेक ठिकाणी आंदोलकांवर लाठीमार झाला. संघटनेच्या वतीने आझाद मैदानावर आंदोलन केले.
जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला, नगर येथे रास्तारोको आंदोलन केले. मात्र याप्रश्नी तोडगा निघला नाही. त्यामुळे आशा व गटप्रवर्तकांच्या भावना अत्यंत तीव्र आहेत. मानधनवाढीशिवाय हे आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा इशारा आंदोलकांनी दिला. शासनाकडून आंदोलन दडपण्याच्या प्रयत्न केल्याबद्दल त्याचा निषेध व्यक्त केला गेला. आंदोलनात सर्वांची इंगळे, द्वारका राऊत, सुरेखा पोटघन, स्मिता ठोंबरे, निर्मला खोडदे, शिल्पा साळुंके, मीना गुजर, सविता नरवडे, आशा खोडदे, विद्या गंधाडे, सुरेखा साळुंके, संजीवनी तरटे यांच्यासह मोठ्या संख्येने आशा व गट प्रवर्तक सहभागी झाल्या होत्या.