नगर – ग्रामसेवक संवर्गाच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत वेळोवेळी अर्ज विनंत्या करूनही प्रश्न निकाली लागत नसल्याने राज्य ग्रामसेवक युनियनने ऑगस्ट क्रांती दिनापासून असहकार आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाच्या पुढील टप्प्यात ग्रामसेवकांनी आज राज्यभरात जिल्हा परिषदांसमोर धरणे आंदोलन केले. नगरमध्ये झालेल्या आंदोलनाचे नेतृत्व युनियनचे राज्य अध्यक्ष एकनाथ ढाकणे यांनी केले.
यावेळी कोणत्याही परिस्थितीत ठोस कार्यवाही शिवाय आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार ग्रामसेवकांनी केला आहे. त्यामुळे ग्रामसेवकांच्या संतापाचा कडेलोट होण्याआधी सरकारने पावले उचलावीत, अशी मागणी ढाकणे यांनी केली. ग्रामसेवकांच्या या आंदोलनाला जिल्हा परिषद कर्मचारी महासंघानेही पाठिंबा जाहीर केला आहे. प्रश्न सोडवण्याबाबत मंत्र्यांपासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनीच आश्वासने दिली. अपवाद वगळता सर्वच आश्वासने हवेत विरली आहेत. त्यामुळे 21 ऑगस्टपर्यंत विविध मार्गांनी ग्रामसेवक आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधणार असून सरकारला जाग न आल्यास व आश्वासनपूर्ती न झाल्यास 22 ऑगस्टपासून राज्यव्यापी कामबंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी पद रद्द करण्यात येवून फक्त पंचायत विकास अधिकारी पद निर्मिती होणे, ग्रामसेवक संवर्गास प्रवासभत्ता शासन निर्णयाप्रमाणे मंजूर करावा, ग्रामसेवकांसाठी शैक्षणिक अर्हता बदलून पदवीधर ग्रामसेवक नेमणुका कराव्यात, 2011 चे लोकसंख्येवर आधारित राज्यभरत ग्रामविकास अधिकारी सजे व पदे वाढ करावीत, आदी मागण्या धरणे आंदोलनावेळी करण्यात आल्या. आंदोलनात सुनिल नागरे, राजेंद्र पावसे, बाळासाहेब आंबरे, एकनाथ आंधळे, अहमद शेख, रमेश बांगर, सारीका वाळूंज, राणी वाघ, राणी वाके, कमल पावसे, मिनाक्षी काणे, अश्विनी कहाणे, रोहिणी नवले आदी सहभागी झाले होते.