पंढरपूर – दलितांना विठ्ठल मंदिर प्रवेशासाठी साने गुरुजींचे आंदोलन सर्वश्रुत आहे, तर सर्व धर्मियांना प्रवेश देण्यासाठी विनोबा भावे यांचेही आंदोलन जनता विसरलेली नाही. आता मात्र करोनामुळे साडेपाच महिन्यांपासून बंद असलेले विठ्ठल मंदिर भाविकांना खुले करण्यासाठी 31 ऑगस्ट रोजी विश्व वारकरी सेना 1 लाख वारकऱ्यांसमवेत मंदिर प्रवेशाचे आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाचे नेतृत्व पुरोगामी नेते प्रकाश आंबेडकर करणार आहे, अशी माहिती वंचितचे प्रवक्ते आनंद चंदनशिवे दिली.
वास्तविक वारकरी संप्रदाय हा सनातनी संप्रदाय असताना देवाचे अस्तित्व न मानणारे आंबेडकरांकडे याचे नेतृत्व आल्याने आंदोलनाचे महत्व वाढले आहे. कायम हिंदुत्ववादी शिवसेना व भाजप सोबत असलेला वारकरी वंचितकडे गेल्याने विचारांचे ध्रुवीकरण होताना दिसत आहे.
लॉकडाउनमुळे विठ्ठल मंदिर 31 ऑगस्टपर्यंत बंद असल्याने आता संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. प्रशासनासोबत नुकतीच झालेली बैठक मोडल्यानंतर आमचे आंदोलन दाबल्यास दुप्पट म्हणजे 2 लाख वारकरी येतील, असा इशारा वंचितचे प्रवक्ते आनंद चंदनशिवे यांनी दिला आहे.