बीड, जालन्यात मोर्चाला हिंसक वळण
मुंबई : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आज दुसऱ्या दिवशीही राज्यात तीव्र आंदोलन सुरु आहेत. विना नेता आणि विना झेंडा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आंदोलन आणि निषेध मोर्चे निघाले.
औरंगाबादेत एमआयएमचा विराट मोर्चा निघाला. हातात तिरंगा घेऊन मुस्लिम समाजाने नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीला तीव्र विरोध दर्शवला. एकीकडे शांततेत आंदोलन सुरु असताना दुसरीकडे बीड आणि जालन्यात मोर्चाला हिंसक वळण लागल्याचे पाहायला मिळाले.
नागपूर आणि ठाण्यात नमाज पठण झाल्यानंतर मुस्लिम समाजाने आंदोलन केले. मशिदींमध्ये हजारोंच्या संख्येने मोर्चेकरी जमले. नागपुरातील चिटणीस पार्कसमोरी ईदु मियॉं मशिदीबाहेर जवळपास एक तासापासून आंदोलन सुरू आहे. ठाण्यातील राबोडीत मुस्लिम समाजाने मोर्चा निघाला.
तसेच आज परभणी बंद आणि मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. परभणी, पुर्णा, पालम, मानवत हे चारही शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले होते. सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हाभरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
एसटी बसला लक्ष्य करण्यात येऊ नये यासाठी खबरदारी म्हणून जिल्ह्यातील सर्व डेपोच्या जवळपास 150 बस बंद ठेवण्यात आल्या होत्या. मुंबईतील वडाळा परिसरात रझा फाउंडेशनच्या वतीने निदर्शने करण्यात आली.
यावेळी या परिसरातील मुस्लिम बांधवांनी मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून निदर्शनेही केली. आंदोलनादरम्यान बीड आणि हिंगोलीत बसेसवर दगडफेक करण्यात आली. बीडमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बसवर दगडफेक करण्यात आली.
तसेच रास्ता-रोकोही करण्यात आला तर दुसरीकडे हिंगोलीतील कळमनुरी शहरामध्ये सकाळी एसटी बसेस फोडल्यानंतर दुपारी दोन वाजताच्या नंतर परत एकदा अज्ञात जमावाने रस्त्यावर उतरत खासगी वाहनांची तोडफोड केली आहे.
जालना जिल्ह्यातील अंबड येथे सर्वधर्मीय लोकांनी आंदोलन केले. शहरातील मुख्य चौकातून मोर्चा काढत आंदोलनकर्त्यांनी या कायद्याचा निषेध करत सरकार विरोधात घोषणाबाजी केली. हा कायदा घटनेचे हणन करणारा असून सरकार ने हा कायदा त्वरित मागे घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. दरम्यान आपल्या मागण्यांचे निवेदन देखील या आंदोलनकर्त्यांनी तहसीलदारांना दिले.