-दत्तात्रय आंबुलकर
राजस्थानचे थर वाळवंट जगातील एक मोठे वाळवंट आहे. या वाळवंटी प्रदेशात राजस्थानचा सीकर जिल्हा येतो. या सीकर जिल्ह्यात दांतारायगड नावाचे एक गाव आहे. एकेकाळी या गावात फारशी शेती होत नसे. पण एका शेतकऱ्याने येथील भूमी “सुजलाम सुफलाम’ बनविली आहे. त्याचीच ही प्रेरक कथा…
सुंडाराम वर्मा हे या शेतकऱ्याचे नाव. वाळवंट क्षेत्रात येणाऱ्या दांतारायगडमध्ये सुंडाराम यांनी एक लिटर पाण्यामध्ये शेतीचा यशस्वी प्रयोग करून दाखविला आहे. या संदर्भात वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे सुंडाराम यांनी गवार, मिरची, कोथिंबीर, मेथी, काबुली चणे यासारखी पिके यशस्वीपणे घेतली आहेत. झाडे व अन्नधान्याची शेती जमिनीत मुरलेले पाणी कसे शोषून घेतात हे सर्वांनाच माहिती आहे. झाडांची खोलवर रूतलेली मुळे हे काम पार पाडतात. मुळांनी पाणी शोषून घेतल्यावर फांद्या व पानापर्यंत ते पोहोचलं जातं. यावर “कॅपिलरी थिअरी’ आधारलेली आहे. सुंडाराम यांनी याच “कॅपिलरी थिअरी’चा अभ्यास केला आणि राजस्थानवरच्या रखरखीत प्रदेशात पीक घेण्याची एक यशस्वी कृषी पद्धत विकसित केली.
शेतकरी पहिली मशागत झाल्यानंतर पेरणीला सुरुवात करतात. पण त्यांनी तसे केले नाही. पहिल्या मशागतीमध्ये जमिनीतले हे तण मुळासकट निघत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी दोन महिने ही जमीन तशीच ठेवली. परतीच्या पावसाच्या वेळी त्यांनी या जमिनीची पुन्हा एकदा नांगरणी करून घेतली. ही नांगरणी 20 ते 25 सेमीपेक्षा जास्त खोल नव्हती. यातून तणांच्या “कॅपिलरी’ अर्थात कोशिका पूर्ण नष्ट होणार नाहीत इतकीच खोल नांगरणी केली. या कॅपिलरीद्वारेच भूगर्भातील जल बाहेर येते व ते पिकांना मिळू शकते हे त्यांच्या लक्षात आले.
त्यानंतर सुंडाराम यांनी आपल्या शेतात पेरणी केली. पेरलेल्या बियाणांसाठी त्यांनी एक लिटर पाण्यामागे 1 मिलीलीटर कीटकनाशक वापरले. हा प्रयोग यशस्वी ठरला. त्यांच्या शेतात भरघोस पीक आले. या एका संशोधनासाठी त्यांनी 10 वर्षे खर्च केली. हा प्रयोग यशस्वी करून दाखविल्यानंतर कोरड्या जमिनीवर त्यांनी अशाच पद्धतीने वृक्षारोपणाची प्रक्रिया सुरू केली. यामुळे रखरखीत प्रदेशात वृक्ष बहरून आले. राजस्थानात हिरवेगार वृक्ष फार क्वचित दिसतात. इथल्या काही भागात तर पिण्याचे पाणी मिळणे अवघड असते. या पार्श्वभूमीवर त्यांचा हा प्रयोग वाळवंटी प्रदेशात वृक्षांसाठी वरदान ठरला आहे.
सुंडाराम यांच्या या प्रयोगामुळे कडुनिंब, रोझवूड, बांबू या सारखे वृक्ष इथल्या प्रदेशात लावण्यात आले आहेत. त्यांची शेती व वृक्षलागवडीची पद्धत अधिक उपयुक्त ठरली आहे. ते आता थर क्षेत्रात अनेक गावांमध्ये जाऊन स्थानिक आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत. भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.