कोल्हापूर – पती-पत्नी हे आयुष्यभराचे जोडीदार असतात. मात्र काही कारणामुळे एकाचा मृत्यू झाल्यास दुसरा जोडीदार एकटा पडतो. अशावेळी पुरुष दुसरे लग्न करतात. पण महिला या लग्न करण्यास तयार होत नाहीत. त्यातच वय जास्त झाले असल्यास त्या दुसरे लग्न टाळतात. मात्र कोल्हापूरात मुलानेच पुढाकार घेऊन विधवा आईचा पूनर्विवाह लावून दिल्याची घटना समोर आली आहे. त्याने आईच्या आयुष्यात पुन्हा आनंद आणला आहे. त्याच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, कोल्हापूरात आई रत्ना, वडील नारायण आणि मुलगा युवराज हे छोटे कुटुंबर राहत होते. पण दुर्दैवाने युवराजचे वडील नारायण यांचा अपघाती मृत्यू झाला. या घटनेनंतर युवराजी आई एकटी पडली. युवराज हा सोंगी भजन करतो त्यामुळे त्या कार्यक्रमांनिमित्त जास्तकरून बाहेर राहावे लागते. तर रत्ना या घरी एकट्याच राहत असत.
युवराजला वडिलांच्या निधनानंतर त्याच्या आईच्या हातात चुडा, कपाळावर कुंकू दिसेनासे झाले. रत्ना याही नेहमी निराश राहायच्या. हे पाहून युवराजने आईचा पुनर्विवाह करून देण्याचे ठरविले. मात्र या गोष्टीसाठी आई रत्ना या मान्य होत नव्हत्या. त्यांनी दुसरे लग्न करण्यास नकार दिला. मात्र युवराजने नातेवाईक, शेजारी यांना सांगून आईला तयार केले. त्याने आईसाठी आपल्या नात्यातीलच मारूती व्हटकर यांची निवड केली. आणि 12 जानेवारी रोजी त्यांचा विवाह लावून दिला. युवराजच्या या धडसी निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दरम्यान, कोल्हापूरातील काही गावात गेल्या वर्षी विधवा प्रथेला मुठमाती देण्यात आली. ती प्रथा न पाळण्याचा निर्धार केला होता. मात्र युवराजने त्याहीपुढे जावून आईचे दुसरे लग्न लावून ही घटना कृतीतून दाखवली आहे. समाज काय म्हणेल या भीतीने आजही अनेकजण इच्छा असतानाही दुसरे लग्न करत नाहीत. मात्र युवराजने समाजाचा विचार न करता आईच्या आनंदासाठी हे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे.