काल दिवसभर माझ्या मैत्रिणीच्या – सुचेताच्या घराला कुलूप होते. कुठे बाहेर गेली की काय या विचाराने मी तिला फोन केला. तर तो नेमका तिच्या मुलीने सुनेत्राने उचलला. “अगं आई कुठे आहे? दिसली नाही दिवसभर. तुझ्याकडे आलेली दिसते. बरी आहे ना?’ माझे बोलणे थांबवत ती म्हणाली, “अगं हो, कालच सकाळी आलीय ती माझ्याकडे आणि तब्येत वगैरे ठीक आहे बरं का तिची. मीच तिला मुद्दामहून बोलावून घेतले.’
“मग दे ना फोन तिला’ मी म्हटले. त्यावर तिचे उत्तर “अगं आत्ताच ती खाली गेलीय जरा, पाय मोकळे करायला. मावशी, यावर्षी मी चैत्रगौर बसवली आहे. चैत्रगौर म्हणजे माहेरवाशीणच नाही का? पूर्वी आई आम्हा दोघी बहिणींना या निमित्ताने 3-4 दिवस माहेरी बोलवायची, सगळं कौतुकानं करायची. नंतर बाबा गेले. तरीही आई जेवायला मात्र आवर्जून बोलवत असे.
तिच्या शब्दकोशात कंटाळा, आराम करणे हे शब्दच नाही बघ! यावेळी मात्र मी विचार केला, आपणच आईला दोन दिवस आपल्या घरी बोलावून कौतुकाने तिचेच माहेपण का करू नये? माझ्या नवऱ्यालासुद्धा हा विचार पटला बघ! आता दोन दिवस आम्ही दोघांनी रजाच घेतली आहे.
तिच्याबरोबर निवांतपणे दोन दिवस घालवायचे ठरवले आहे आम्ही.’ “मग काय आई खुश असेल अगदी!’ त्यावर ती उत्तरली, “अगं, सुरुवातीला थोडा संकोच वाटला तिला. म्हणत असते इतका आनंद कौतुक, आराम किती वर्षांनी मिळतोय मला.
किती प्रेमाने करताय तुम्ही दोघे सारं हे! माझेही माहेर होतेच की; पण काय? मावशी, असे हे आईचे वेगळे माहेरपण करताना मलाही आनंद समाधान मिळतेय बघ! तूसुद्धा एक चक्कर मारना! आज माहेरी गेलेल्या माझ्या आईच्या मैत्रिणीला म्हणजे तुला मी आवर्जून बोलावते आहे. नक्की ये तू.’ तिने प्रेमाने केलेल्या आमंत्रणाचा मी लगेचच स्वीकार केला. आईचे माहेरपण करणाऱ्या सुनेत्रासारख्या मुली प्रत्येक आईला लाभू देत- हीच मनापासूनची इच्छा!