– शिवशंकर निरगुडे
हिंगोली – आतापर्यंत प्रत्यक्षात आपण सासू सुनेची भांडणे ही चुलीपर्यंत मर्यादित असल्याची बघितली आहेत. परंतु, या पलीकडेही जाऊन हिंगोली मधील एका सासू सुनेचे भांडण चक्क ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात पोहोचले आहे. सासू एका पॅनल कडून तर सून एका पॅनल कडून परस्पर विरोधी उभे ठाकल्याने मतदार चांगले संभ्रमात पडले आहेत. सध्या या दोघी सासू सुनेचा विषय राजकीय वर्तुळात चर्चेचा बनला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, येत्या १८ तारखेला हिंगोली जिल्ह्यात ६३ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडते आहे. आज या निवडणुकीचा प्रचार कार्यक्रम थांबला असून, उमेदवारांना आचारसंहितेचे पालन करावे लागणार आहे. या निवडणुकीमुळे गाव पातळीवर कडाक्याच्या थंडीत सुद्धा राजकारण तापू लागले आहे. विविध चर्चेने गावकडे गाजू लागले आहेत.
त्याचबरोबर थेट जनतेतून लढत असल्यामुळे एखादा सदस्य कमी आला तरी चालेल थेट सरपंच पदाचा गुलाल आपलाच आला पाहिजे असेही देखील पक्षप्रमुख त्याचबरोबर पॅनल प्रमुखांकडून बोलले जात आहे. जनतेतून थेट निवडून येणे हे उमेदवारांसमोर चांगलंच आव्हान बनलं आहे त्याचबरोबर प्रचारासाठी देखील चांगलीच दमछाक होत आहे.
हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव तालुक्यातील हाताळा या गावामध्ये चक्क सासू – सुना या परस्पर विरोधी निवडणूक रिंगणात उतरल्यामुळे गावकऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्याचबरोबर मतदारासमोरील देखील संभ्रम वाढला आहे. हाताळा गावातील घनश्याम श्रीरंग धामणकर आणि सुभाषराव श्रीरंग धामणकर हे दोघे सख्खे भाऊ आहेत. सुभाषराव श्रीरंग धामणकर यांची पत्नी संगीता सुभाषराव धामणकर या हाताला गावच्या माजी सरपंच होत्या. परंतु या वेळेस देखील त्यांनी रिंगणात झेप घेतली आहे.
संगीता धामणकर यांच्या विरोधात त्यांच्या सख्ख्या सासूबाई शोभाबाई श्रीरंग धामणकर यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज भरून सुनेच्या विरोधात उडी घेतली आहे.सध्या या गावात चार पॅनल उभे ठाकले आहेत. तर एक शारदाबाई संतोष काळे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलाय. जवळपास 35 हून अधिक उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. परंतु सध्या या निवडणुकीत इतर उमेदवारांपेक्षा या दोघी सासा सुनांची चर्चा जास्त होते आहे.
परंतु कुणाचं पारडं जड राहणार,सून सासूला भारी भरणार की सासू सुनेला,हे मात्र वीस तारखेच्या निवडणूक निकालानंतर कळेल उद्या सर्व उमेदवाराचे भवितव्य मतदान पेटीत बंद होईल उद्या जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतचे मतदान आहे त्यामुळे उमेदवार घरोघरी जाऊन भेटीगाठी घेतांना दिसत आहेत