छत्तीसगड – येथील महासमुंदमध्ये मन हेलावणारी घटना समोर आली आहे. दारूड्या नवऱ्यासोबत वारंवार वाद होत असल्याच्या कारणावरून एका महिलेने आपल्या पाच मुलींसह रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली आहे. या घटनेने सर्वानांच धक्का बसला आहे.
उमा साहू ४५ असे या महिलेचे नाव असून केजराम तिच्या दारुड्या पतिचे नाव आहे. अन्नपूर्णा, यशोदा, भूमिका, कुमकुम आणि तुलसीला असे मृत मुलींचे नावे असून सर्वांचे वय १० ते १८ या वयोगटातील आहे. या घटनेची कोतवाली पोलिसात नोंद घेण्यात आली आहे.
या घटनेबाबत सविस्तर वृत्त असे की, बुधवारी संध्याकाळी केजराम दारू पिऊन घरी आला तेव्हा पत्नी उमा आणि त्याच्यात कडाक्याचे भांडण झाले. हा वाद आणखी वाढत गेल्यावर उमा संध्याकाळी ७.३० च्या सुमारास आपल्या पाच मुलीसह घराबाहेर पडल्या. त्यानंतर रात्री ९.३० च्या सुमारास लिंक एक्सप्रेससमोर या सर्वांनी उडी मारून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली.
इमलीभांठा नदीजवळ रेल्वे ट्रॅकवर गुरुवारी सकाळी लोकांनी काही मृतदेह पडलेले पाहिले. त्यानंतर त्याची माहिती कोतवाली पोलीस स्टेशनला देण्यात आली. पोलीस घटनास्थळी पोहचल्यानंतर रेल्वेलाही याची माहिती दिली त्यानंतर काही वेळ याठिकाणची रेल्वे वाहतूक थांबवण्यात आली होती.