नवी दिल्ली : उत्तर भारतात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडल्याने पारा थोडा खाली आला. दिल्लीतल्या काही भागात संध्याकाळी पावसाला सुरुवात झाल्याने ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती.
अवकाळी पावसामुळे दिल्ली विमानतळावर उतरणारी काही विमान लखनौ, अमृतसर, अहमदाबाद आणि जयपूरला एकूण 14 उड्डाणे वळविण्यात आली आहेत, असे दिल्ली विमानतळाच्या प्रवक्त्याने सांगितले.
काल सायंकाळी साडेआठपर्यंत सफदरजंग आणि पालम वेधशाळांमध्ये 18.5 आणि 14.8 मिमी पावसाची नोंद झाली. पश्चिमेकडील अस्थिरतेच्या परिणामामुळे वायव्य भारतात 4 मार्च ते 6 मार्च दरम्यान पुन्हा पाऊस होण्याची शक्यता आहे.
भूमध्य भागात झालेल्या चक्रीवादळामुळे हा पाऊस झाल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. हिमाचल प्रदेशाच्या काही भागात हिमवृष्टी झाली. या भागात आजही हिमवृष्टी आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.