मुंबई : अजित पवार यांच्या शपथविधीला किती आमदार उपस्थित होते याबाबतचे गुढ कायम आहे. पक्षाने शपथविधीला हजर असणारे सात आमदार पक्षात परत आल्याचे जाहीर केले आहे. येवढेच नव्हे तर आमची निष्ठा शरद पवार यांच्यावरच असल्याचे या आमदारांनी म्हटले आहे. त्यामुळे बंड करून ाजित पवार एकाकी पडल्याचे चित्र समोर येत आहे.
शरद पवार यांचे पुतणे अजित पावार यांनी भारतीय जनता पक्षाशी हातमिळवणी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्याचवेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची दुसऱ्यांदा शपथ घेतली. या समारंभाला नाशिकमधील दिलीप बनकर आणि माणिकराव कोकाटे हे आमदार उपस्थित होते. त्यांनी स्वतंत्रपणे ट्विट करत आम्हाला शपथविधीबाबत अंधारात ठेवले होते. आम्ही राष्ट्रवादी कॉंग्रेससोबतच आहोत. आमचा पक्षाच्या अध्यक्षांवरआमची निष्ठा कायम आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान या शपथविधीला हजर राहणारे राजेंद्र शिंगणे (बुलढाणा), संदीप क्षीरसागर(बीड), सुनील शेळके (मावळ), सुनील भुसारा (विक्रमगड), नरहरी झिरवळ (दिंडोरी) आणि सुनील टिंगरे (वडगाव शेरी) हे आमदार पक्षात परतले. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली सुरू असणाऱ्या बैठकीला परळीचे आमदार धनंजय मुंडे हेही सहभागी झाले होते.
मी पक्षाच्या धोरणांविरोधात नाही. मी राजभावनात अजित पवार यांनी सांगितल्यामुळे पोहोचलो. ते पक्षाचे गटनेते असल्यामुळे त्यांच्या सुचनेनुसार मी गेलो. तेथे काय आहे? याची मला कल्पना नव्हती. मी पक्षासोबतच आहे. मी माझा निर्णय कधीही बदलत नाही, असे ट्विट कोकाटे यांनी केले असून या ट्विटला त्यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना टॅग केले आहे.
बनकर यांनी म्हटले की. अजित पवार यांनी सांगितल्याप्रमाणे मी तेथे पोहोचलो. तेथे काय वाढून ठेवले आहे, याची मला कल्पना नव्हती, असे बनकर म्हणअले, तर शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेत शिंगणे म्हणाले, मी राजभवनावर अजित पवार यांच्या बोलावण्यानुसार पोहोचलो. तर तेथे आठ ते 10 आमदार होते. तेथे काय होतेय याची आम्हापैकी कोणालाच कल्पना नव्हती. शपथविधी झाल्यानंतर आम्ही शरद पावारसाहेब यांच्याकडे पोहोचलो.
बंडखोर आमदारांना बंड केल्यास तुमची आमदारकी जाईल. पोटनिवडणुकीत तुम्ही निवडून येणार नाहीत याची काळजी कॉंग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी घेईल, असा इशारा पवार यांनी दिला आहे.