नवी दिल्ली – कोरोना महामारीचा प्रचंड फटका बसलेल्या देशांच्या यादीत ब्राझील सर्वात वरच्या स्थानी आहे. गेल्या चोवीस तासांत एका दिवसात देशात सर्वाधिक मृत्यू (१९५४) झाल्याची नोंद आहे. भारत व ब्राझीलची तुलना केल्यास भारतात कोरोनाचे एकूण बाधित १ कोटी ११ लाख २५ हजार १७ आहेत. ब्राझीलमध्ये १ कोटी १२ लाख ६२ हजार ७०७ आहेत. मात्र ब्राझीलमधील कोरोनामुळे झालेल्या मृतांची एकूण संख्या २.६८ लाख आहे. भारतात १.५८ लाख मृत्यू झाले. ब्राझीलमधील मृतांचे हे प्रमाण ७० टक्के जास्त आहे.
ब्राझीलचे राष्ट्रप्रमुख बोल्सोनारो यांची कोरोनाबद्दलची बेपर्वाई देशाला संकटात टाकण्यासाठी कारणीभूत ठरल्याचे तज्ज्ञांना वाटते. संसर्गाच्या सुरुवातीपासूनच बोल्सोनारो बेजबाबदार विधाने व निर्णय घेत आले आहेत. ब्राझीलमध्ये योग्य वेळी मास्क अनिवार्य करण्यात आला नाही किंवा इतर नियमही कडक लागू करण्यात आले नव्हते. बोल्सोनारो यांनी सुरक्षेच्या उपाययोजनांबद्दलही गांभीर्य दाखवले नाही. अमेरिकेचे माजी अध्यक्ष ट्रम्प व बोल्सोनारो यांनी कोरोनाची परिस्थिती अत्यंत वाईट पद्धतीने हाताळल्याचे तज्ज्ञांना वाटते.
ब्राझीलमधील आघाडीची आरोग्य संस्था फियोक्रूजने कोरोनामुळे देशाची आरोग्य यंत्रणा उद्ध्वस्त होण्याच्या उंबरठ्यावर असल्याचा इशारा दिला आहे. ब्राझीलच्या २७ राज्यांच्या २५ राजधान्यांमधील आयसीयू ८० टक्क्यांहून जास्त रुग्णांनी भरलेले आहेत. ब्राझील मानवतेसाठी संकट बनले आहे. मृत्यूंच्या बाबतीत अमेरिकेनंतर ब्राझील दुसऱ्या क्रमांकावर आहे.