दोन वर्ष कचरा टाकता येईल एवढीच जागा शिल्लक
पिंपरी – मोशी कचरा डेपोत दोन वर्ष कचरा टाकता येईल, एवढीच जागा शिल्लक राहिली आहे. त्यानंतर कचरा कुठे टाकायचा, असा प्रश्न निर्माण होणार आहे. पुनावळे येथील प्रस्तावित कचरा डेपोची जागाही महापालिकेच्या ताब्यात आलेली नाही. यामुळे भविष्यात कचऱ्याचे संकट निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.
पिंपरी चिंचवड शहरात सध्या 900 ते 950 टन कचरा निर्माण होतो. हा सर्व कचरा सध्या मोशी येथील कचरा डेपोत जमा केला जातो. ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यातून खतनिमिर्ती केली जाते. तर जवळपास पाच टन प्लॅस्टिकच्या कचऱ्यातून इंधन निर्मिती केली जाते. मोशी येथील कचरा डेपोची निर्मिती 1991 साली झाली आहे. हा परिसर जवळपास 81 एकरचा आहे. आता येथील कचरा डेपोची क्षमता संपुष्टात आली आहे. जेमतेम दोन वर्ष याठिकाणी कचरा टाकता येणार आहे. मात्र दोन वर्षात पर्यायी व्यवस्था न झाल्यास शहरात पुण्याप्रमाणेच आणीबाणीची परिस्थिती उद्भवू शकते.
पुनावळे येथे कचरा डेपो करण्याचा महापालिकेचा मानस आहे. याठिकाणी वन विभागाची 61 एकर जागा महापालिका घेणार असून त्याबदल्यात पिंपरी पेंढार येथे वन विभागाला महापालिका पर्यायी जागा देणार आहे. मात्र पुनावळे ग्रामस्थांचा येथील कचरा डेपोला तीव्र विरोध आहे. आगामी दीड वर्षाच्या कालावधीत महापालिकेची निवडणूक असल्याने सत्ताधारी भाजप येथील कचरा डेपोबाबत आग्रही राहणार नसल्याचे संकेत मिळत आहे.
जर त्यांनी या कचरा डेपोसाठी प्रयत्न केल्यास ग्रामस्थांचा तीव्र विरोध त्यास होण्याची शक्यता आहे. जरी येथील जागा आत्ता महापालिकेस मिळाली तरी या जागेवर कचऱ्यावर करण्यात येणारी प्रक्रिया यंत्रणा उभारण्यास दोन वर्षाचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे येथील कचरा डेपोच्या निर्मितीस आत्ताच सुरवात होणे आवश्यक आहे.
“बायो मायनिंग’चे भवितव्य अंधारात
मोशी येथील कचरा डेपोत बायो मायनिंग हा प्रकल्प उभारण्याचा महापालिकेचा मानस आहे. यामुळे येथील जवळपास 90 टक्के कचऱ्यावर प्रक्रिया होऊ शकते. हा प्रकल्प उभारल्यास दररोज येणाऱ्या कचऱ्याची समस्या चुटकीसरशी सुटू शकते. बायो मायनिंगचा प्रकल्प उभारणीसाठी जवळपास दोन वर्षाचा कालावधी लागणार आहे. मात्र बायोमायनिंगच्या या प्रकल्पाची निविदाच अद्याप महापालिकेने काढलेली नाही. यामुळे या प्रकल्पाचेही भवितव्य अंधारातच आहे. यामुळे मोशी येथील कचरा डेपोचे काऊनडाऊन सुरू झाले असून वेळीच उपाययोजना न केल्यास भविष्यात कचऱ्याची मोठी समस्या निर्माण होऊ शकते.