पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहराच्या हद्दीवरील मोशीतील टोलनाक्याची टोल वसुलीची मुदत शुक्रवारी मध्यरात्री संपली. त्यानंतर आयआरबी कंपनीने शुक्रवारी रात्री 12 वाजल्यापासून टोल वसुली बंद केली आहे. त्यामुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर वाहनचालकांची टोलसोबतच वाहतूक कोंडीतूनही सुटका झाली आहे.
औद्योगिक परिसरातील मालाची वाहतूक करणारी जड वाहने या मार्गावरून जात होती. वाहनांची मोठी वर्दळ असल्याने टोल नाक्यामुळे मोठी वाहतूक कोंडी होत होती. मोशीतील टोलनाक्यावर वाहनांच्या रांगाच रांगा लागत होत्या. त्यामुळे रांगेमध्ये बराच वेळ थांबावे लागत असल्याने वाहनचालकांना वेळेचा आणि इंधनाचा फटका बसत होता. टोल नाक्याची मुदत संपली आहे. त्यामुळे टोल वसुली आजपासून बंद झाली आहे. टोल वसुली बंद झाल्याने वाहतूक कोंडी होत नसल्याने वाहने सुसाट जात आहेत. टोल बंद झाल्याने वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले.
टोल वसुली करणाऱ्या आयआरबी कंपनीने त्याठिकाणी फलक लावला आहे. सर्व वाहनधारकांना कळविण्यात येते की, भारतीय राजपत्र (स 1305 गुरुवार 15 डिसेंबर 20 नुसार मोशी व चांडोली (राजगुरूनगर) या प्रकल्पाची 8 ऑक्टोबर 2021 रोजी रात्री 12 नंतर समाप्त होत आहे. त्यामुळे मेसर्स ए टी आर इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड (आय आर बी) कडून पथकर वसुली बंद करण्यात आली आहे. याची नोंद घ्यावी, असा सूचना फलक आयआरबी कंपनीने टोलनाक्यावर लावला आहे.
आधी नाशिक फाट्याला होता नाका
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत पुणे -नाशिक महामार्गावर मोशी येथे टोलनाका आहे. याठिकाणच्या टोल वसुलीचे कंत्राट आयआरबी कंपनीला देण्यात आले होते. तर या कंपनीने हा टोलनाका पुणे-नाशिक महामार्गावर सध्या भोसरी वाहतूक शाखेचे कार्यालय आहे, त्याजवळ हा टोलनाका उभारला होता.
मात्र, याचा भुर्दंड पिंपरी-चिंचवडकरांना नको, यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांनी या टोलनाक्याची तोडफोड केली. त्यानंतर हा टोलनाका खेड तालुक्याच्या हद्दीत की महापालिका हद्दीत सुरु करायचा, यावर चर्चा झाली. त्यानंतर महापालिका हद्दीतून खेड तालुक्यात प्रवेश करताना इंद्रायणीनदी पार करण्यापूर्वीच मोशी येथे या टोलनाक्याची जागा ठरवून, त्याठिकाणी टोलवसुली सुरू करण्यात आली.
पीएमपी बसकडूनही वसुली नाशिक महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनांना वाहनचालकांना टोल भरण्यासाठी थांबावे लागत होते.
अगदी पीएमपीएमएल बसकडूनही टोल वसुली केली जात होती. त्याकरिता बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसदराच्या तिकीटापेक्षा एक रुपया अधिकचा मोजावा लागत होता. अनेक वर्षे प्रवाशांना हा भुर्दंड सहन करावा लागला होता. मात्र, टोल हा वाहनांवर आकारला जातो, तो प्रवाशांवर नव्हे अशी प्रवाशांनी भूमिका घेतल्याने प्रवाशांकडून होणारी अतिरिक्त रकमेची वसुकी थांबली. तर काही काळानंतर स्थानिक वाहनांना टोलमधून वगळण्यात आले होते.
नोटबंदीमुळे मिळाली होती मुदतवाढ
पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील नाशिक फाटा ते राजगुरूनगर (चांडोली) या दरम्यान 30 किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्ग बांधा, वापरा आणि हस्तांतरण करा या (बीओटी) धर्तीवर केंद्र व महाराष्ट्र सरकारने ए.टी.आर.इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला 25 ऑगस्ट 2003 साली मंजुरी दिली होती.
मंजुरी मिळाल्यानंतर कंपनीने नाशिक फाटा ते राजगुरूनगरदरम्यान जवळपास 30 कि. मी. राष्ट्रीय महामार्गाच्या दोन मार्गाचे रूपांतर चार मार्गात केले. महामार्गाचे काम पूर्ण केल्यानंतर कंपनीला मोशी व चांडोली येथे टोल नाका उभारून जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांकडून टोल आकारणी करण्यास 15 वर्षांच्या कालखंडासाठी 15 डिसेंबर 2005 पासून परवानगी दिली. कंपनीला देण्यात आलेली 15 वर्षांची मुदत मागील महिन्याच्या 14 सप्टेंबर 2021 ला समाप्त झाली.
परंतु 9 नोव्हेंबर 2016 ते 2 डिसेंबर 2016 पर्यंत 23 दिवस टोल वसुलीला नोटबंदी काळात स्थगिती दिली होती. नोटबंदी काळातील नुकसानीची भरपाई म्हणून 14 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर 2021 या दरम्यान 24 दिवसांची मुदतवाढ केंद्र सरकारने टोल वसुलीसाठी दिली होती.