ग्रामीण भागातील स्थिती : करोनाबाधित दरातही दोन टक्क्यांनी वाढ
पुणे – ग्रामीण भागातही करोना संसर्ग झपाट्याने वाढत असून, मागील पंधरा दिवसांत ग्रामीणमधील बाधित दर 2.28 टक्क्यांनी तर तर मृत्यू दर 0.56 टक्क्याने वाढला आहे. त्यावरून करोनाचा वाढता वेग लक्षात येत असून, ही संसर्ग साखळी तोडण्यासाठी “ब्रेक द चेन’ याची कडक अंमलबजावणी होणे आवश्यक आहे.
जिल्ह्यातील ग्रामीणमध्ये आतापर्यंत 6 लाख 65 हजार 690 संशयितांची नमुने तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 1 लाख 47 हजार 702 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, ग्रामीणमधील बाधित सापडण्याचे प्रमाण 22.18 टक्के इतके आहे.
तर पंधरा दिवसांपूर्वी (दि.2) हे प्रमाण 19.9 टक्के इतके होते. अवघ्या पंधरा दिवसांत बाधितांचा वेग 2.28 टक्क्यांनी वाढला आहे. तसेच एकूण बाधितांपैकी 2 हजार 296 जणांचा मृत्यू झाला होता, म्हणजेच पंधरा दिवसांपूर्वी मृत्यूदर 1.9 टक्के होता. तर आज मृत्युदर 1.65 इतका आहे. बाधित संख्या वाढल्यामुळे करोनामुक्तीचे प्रमाण 5 टक्क्यांनी घटले. तर सक्रीय बाधित संख्या पाच टक्क्यांनी वाढली.
दि. 2 ते 15 एप्रिलची आकडेवारी
ग्रामीण भागात मागील पंधरा दिवसांत 81 हजार 496 संशयितांची नमुने तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 31 हजार 510 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. नमुने तपासणीच्या संख्येत बाधित सापडण्याचे प्रमाण 39 टक्के इतके आहे. यामध्ये 139 बाधितांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 21 हजार 242 बाधित करोनामुक्त झाले आहेत. ग्रामीणमधील सक्रीय बाधित संख्या दुपटीने वाढली असून, आज 19 हजार 456 सक्रीय बाधित संख्या आहे.