मुंबईत कॉंग्रेसची विशेष बैठक : पक्षश्रेष्ठींकडे पाठविलेली यादी आल्यानंतर निर्णय
संतोष गव्हाणे
पुणे – राज्याच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात जिल्ह्यातून कॉंग्रेसकडून भोरचे आमदार संग्राम थोपटे यांचे नाव पहिल्याच यादीत असल्याने 1992 नंतर भोरला मंत्रिपदाची संधी मिळणार आहे. याबाबत मुंबईत विशेष बैठक घेण्यात आली असून याबाबतचा अहवाल पक्षश्रेष्ठींकडे पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याच्या वृत्ताला कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींकडून दुजोरा देण्यात आला आहे. गुरूवार (दि.12) नंतर याबाबत घोषणा केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
राज्यात मोठ्या घडामोडीनंतर महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री तसेच अन्य मुख्य पदांबाबत निर्णय झाले असताना मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागले आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यातून कॉंग्रेसचे भोर मतदारसंघाचे आमदार संग्राम थोपटे यांना सुरवातीलाच मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे. राज्यात कॉंग्रेसच्या इतिहासात भोरचे थोपटे कुटुंब हे कॉंग्रेसचे निष्ठावान मानले जाते. त्यातही दिल्ली दरबारी भोरचे माजी आमदार अनंतराव थोपटे यांची प्रतिमा ज्येष्ठ नेते म्हणून मोठी आहे.
मंत्रिपदाच्या काळात अनंतराव थोपटे यांनी राज्यात केलेल्या कामाची दखल आजही घेतली जाते, त्यांनी राबविलेल्या योजनांची उदाहरणे शासन दरबारी आजही दिली जातात किंबहुना 1999 मध्ये राज्यात सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्रिपदासाठी अनंतराव थोपटे हेच दावेदार मानले जाते होते. परंतु, राज्याच्या घडामोडीत 1992 मध्ये मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळणारे शरद पवार यांच्या मंत्रिमंडळातून थोपटे यांना वगळण्यात आले तर 1999 मध्ये राज्यात कॉंग्रेसची सत्ता आली त्यावेळी अनंतराव हे पराभूत झाले होते, त्यामुळे पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी प्रचार सभांतून जाहीर केल्यानंतरही मुख्यमंत्री म्हणून थोपटे यांना संधी मिळू शकली नाही. त्यातून विलासराव देशमुख हे पहिल्यांदा मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले होते.
2004च्या निवडणुकीत अनंतराव थोपटे हे पुन्हा निवडून आले. परंतु, त्यांना मंत्रीमंडळात स्थान मिळू शकले नाही. यामुळे राजकारणाला कलाटणी देत त्यांनी 2009 मध्ये आपले चिरंजीव संग्राम थोपटे यांना निवडणूक लढविण्यास सांगितले त्यावेळी संग्राम थोपटे बहुमतांनी निवडून आले होते. 2014 मध्ये देशात भाजपची लाट असताना जिल्ह्यात केवळ थोपटे यांनी कॉंग्रेसचा गड राखला होता. त्यावेळी संग्राम थोपटे यांनी सर्व आव्हाने परतवून लावली होती. 2019 मध्येही विजयी होत संग्राम थोपटे यांनी हॅटट्रिक साधली.
राज्यात भाजपच्या लाटेत अनेक राजकीय मातब्बरांकडून पक्ष बदलले जात असताना भोरचे थोपटे यांच्याकडून पक्षनिष्ठा दाखविली गेली आहे. निवडणुकीच्या वेळी तसेच नंतर मोठ्या नेत्यांकडून आमिषे दाखविली जात असतानाही कॉंग्रेसचा “हात’ सोडण्यापेक्षा पक्षाकडून उमेदवारी मिळवीत थोपटे यांनी हॅटट्रिक साधली आहे, याच गोष्टींची पक्ष पातळीवर दखल घेतली गेल्याने यावेळीच्या मंत्री मंडळ विस्तारात जिल्ह्यातून कॉंग्रसेचे आमदार संग्राम थोपटे यांचे नाव पहिल्याच यादीत आले असल्याचे सांगितले
जात आहे.
दिल्ली दरबारी वजन…
राज्यातील कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे दिल्ली दरबारी आजही मोठे वजन असल्याचे सांगितले जाते. राज्यात पक्षाच्या स्थितंतरीय काळात पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी नेहमीच थोपटे यांच्याशी सल्लामसलत केलेली आहे. राज्यात कॉंग्रेसच्या पक्षीय वाटचालीत थोपटे यांचे योगदान मोठे असल्याचे दिल्लीकरही मान्य करतात. यामुळे त्यांचा वारसा म्हणून यावेळी मंत्रिपद भोरच्या पारड्यात पडणार, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
कॉंग्रेसशी आम्ही नेहमीच पक्षनिष्ठा दाखविलेली आहे, मिळालेल्या संधीतून समाजोपयोगी कामांवर भर दिलेला आहे. लोकापयोगी विचारांची परंपरा आजही आमच्याकडून जपली जात आहे. यामुळे पक्षाकडून याची दखल घेतली जाईल, याबाबत विश्वास आहे.
– संग्राम थोपटे, आमदार, भोर
कॉंग्रेसच्या आमदारांशी याबाबत विशेष बैठक घेवून चर्चा करण्यात आली असून यामध्ये भोरला स्थान देण्याबाबत आग्रह आहे. मंत्रीमंडळातील समावेशाबाबतचा अहवाल पक्षश्रेष्ठींकडे पाठविण्यात येणार असून त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल.
– बाळासोहब थोरात, गटनेते/प्रदेशाध्यक्ष, कॉंग्रेस