संगमनेर – मान्सूनपूर्व पावसाने सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी संगमनेर तालुक्यातील पठार भागात हजेरी लावली. पावसाबरोबरच वादळ आल्याने केवळ पंधरा मिनिटांत होत्याचे नव्हते झाले. याभागातील 40 ते 45 ठिकाणी घरांची पडझड, छताचे पत्रे उडून जाण्यासह सुमारे 50 ते 60 शेततळ्यांचे कागद फाटल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. परंतु, शासकीय मदतीबाबत अद्याप कुठलाही निर्णय शासनाने घेतला नसून, प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करत शासनास अहवाल देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आमदार बाळासाहेब थोरात यांनी तालुक्यातील नुकसानग्रस्त गावांची पाहणी केली. यावेळी जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती अजय फटांगरे, शंकर खेमनर, इंद्रजीत खेमनर, जिल्हा परिषद सदस्य मीरा शेटे, पंचायत समिती सदस्य किरण मिंडे, जयराम ढेरंगे उपस्थित होते.
पठारभागातील जांभूळवाडी फाटा येथे सोमवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास अचानक वादळीवाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. त्यावेळी एकाच वेळी दहा ते पंधरा घरांचे पत्रे उडून गेल्याने मोठे नुकसान झाले होते. थोरात यांनी नुकसानग्रस्त कुटुंबीयांची भेट घेऊन नुकसानीचा आढावा घेत प्रत्यक्ष पाहणी केली. वादळीवाऱ्यासह गारांचा पावसात घरांचे नुकसान झालेल्या कुटुंबांना शासनाकडून मदत मिळवून द्यावी, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहे. यावेळी तहसील, पंचायत समिती, महावितरण, सार्वजनिक बांधकाम, सहकार, पशुसंवर्धन, कृषी यासह सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. चारा छावण्यांतील शेतकऱ्यांचे हाल थोरात साखर कारखाना स्थळ, तळेगावदिघे आणि साकुर या ठिकाणी कारखाना आणि राजहंस दूध संघाच्यावतीने चारा छावण्या सुरू असून, तीन छावण्यांमध्ये सुमारे दोन हजारांपेक्षा अधिक जनावरे आहेत. या जनावरांच्या देखभालीसाठी 500 शेतकरी छावणीत मुक्कामाला असतात.
सोमवारच्या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने छावणीतील शेतकऱ्यांचे हाल झाले. पाऊस असला तरी जनावरांना सोडून घरी जाणे शक्य नसल्याने अनेकांनी प्लास्टिक कागदाचा निवाऱ्यासाठी आधार घेतला. वीजपुरवठा खंडीत झाल्याने छावणीतील शेतकऱ्यांना अंधाराचा सामना करावा लागला. वादळात 40 ते 45 ठिकाणी घरांची पडझड अत्यंत कमी वेळात मोठ्या प्रमाणात वादळ आल्याने केवळ पंधरा मिनिटांत जांभूळवाडी फाटा, वरुडी पठार, ढोरवाडी, जवळे बाळेश्वर, पिंपळगाव देपा, खंडेरायावाडी यापरिसरात सर्वाधिक घरांची पडझड होऊन छताचे पत्रे उडाले.